Breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई

“सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येऊन आघाडी केल्यास एनडीएला….;” मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि केसीआर भेटीवर रामदास आठवलेंची प्रतिक्रिया

मुंबई |

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निमंत्रणावरून तेलंगणचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी मुंबईत ठाकरे यांची भेट घेतली आणि त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली. याशिवाय राव यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचीही त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. राव यांनी सध्या भाजपाच्या विरोधात आघाडी उघडली असून, बिगरभाजपा आणि काँग्रेस आघाडीचे नेतृत्व करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे आणि पवार यांची त्यांनी घेतलेली भेट महत्त्वाची मानली जाते. दरम्यान, या तिसऱ्या आघाडीच्या तयारीवर केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

“शिवसेना, तेलंगणा राष्ट्र समिती (टीआरएस) आणि इतर पक्षांनी एकत्र येऊन राष्ट्रीय पातळीवर तिसरी आघाडी स्थापन केली असली तरी एनडीएला कोणताही धोका नाही, कारण पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये लोक आनंदी आहेत,” असे केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी रविवारी सांगितले. तसेच २०२४ च्या लोकसभा निवडणुका आणि पाच राज्यांमध्ये सुरू असलेल्या विधानसभा निवडणुका भाजपा जिंकेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. “तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेऊन तिसरी आघाडी स्थापन करण्याबाबत चर्चा केली असली, तरी एनडीएला कोणताही धोका नाही,” असं रामदास आठवले म्हणाले.

दरम्यान, महाराष्ट्र आणि तेलंगण या बिगरभाजपाशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी रविवारी केंद्रातील भाजपा सरकारच्या विरोधात रणशिंग फुंकले. देशातील वातावरण गढूळ झाले असून, खालच्या पातळीवर सुडाचे राजकारण सुरू असल्याची टीका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली, तर केंद्रीय यंत्रणांचा दुरुपयोग केला जात असल्याचा आरोप तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी केला. बदल ही काळाची गरज असल्याचे मतही या मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केले. जुलमाच्या विरोधात महाराष्ट्राच्या भूमिवरून सुरू होणारा संघर्ष यशस्वी होतो, असे सूचक वक्तव्य तेलंगणचे मुख्यमंत्री राव यांनी या वेळी केले. देशात बदल घडविण्यासाठी राष्ट्रीय पक्षांसह अन्य समविचारी पक्षांच्या नेत्यांशी चर्चा सुरू आहे. थोडा वेळ लागेल, पण सारे संघटित होतील आणि चित्र बदलेल. ही लढाई लोकशाहीची मूल्ये जपण्यासाठी आहे, असे राव म्हणाले.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button