राज्यात आजही धो धो पाऊस; मुंबई, अहिल्यानगर, पुणेसह ‘या’ जिल्ह्यांना अलर्ट जारी

Maharashtra Rain Alert : राज्यात अनेक भागात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरु असल्याने नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. तर दुसरीकडे अहिल्यानगर, धाराशिव आणि बीड जिल्ह्यातील अनेक तालुक्यात अतिवृष्टी झाल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी आता राज्य सरकारकडे मदतीची मागणी करत आहे.
तर दुसरीकडे आज ( 28 सप्टेंबर) देखील राज्याती अनेक भागात मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाकडून (IMD) वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे अनेक जिल्ह्यांना रेड, यलो आणि ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने राज्यात 30 सप्टेंबरपर्यंत मुसळधार पावसाची शक्यता आहे. तसेच राज्यात पुढील 48 तास राज्यातील काही भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे.
हेही वाचा – पवना धरणातून २८८० क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग सुरू; नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा
या जिल्ह्यांना रेड अलर्ट
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, नाशिक घाटमाथा, पुणे घाटमाथा या भागात आज अतिमुसळधार आणि मुसळधार पावसाची शक्यता असल्याने या भागासाठी हवामान विभागाकडून आज रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.
या जिल्ह्यांना यलो अलर्ट
तर दुसरीकडे नंदूरबार, धुळे, जळगाव, अहिल्यानगर, पुणे, सातारा, कोल्हापूर, जालना, बीड, परभणी, धाराशिव, बुलढाणा, अकोला, वाशिम, सांगली, सोलापूर, हिंगोली, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा या जिल्ह्यांसाठी आज भारतीय हवामान विभागाकडून यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
रत्नागिरी, नाशिक, सातारा घाटमाथा, कोल्हापूर घाटमाथा या भागासाठी आज हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.





