केंद्रीय मागासवर्ग आयोगामार्फत मराठा आरक्षण द्या; मुख्यमंत्री ठाकरेंचं पंतप्रधान मोदींना पत्र
मुंबई – Maratha Reservation: मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिलं आहे. केंद्र सरकारनं मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी पुढाकार घेऊन केंद्रीय मागासवर्ग आयोगामार्फत आरक्षण द्यावं, अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली आहे.
सुप्रीम कोर्टानं मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिणार असल्याचं सांगण्यात आलं होतं. मराठा समाजाला केंद्रीय मागासवर्ग आयोगामार्फत आरक्षण देण्याची मागणी नरेंद्र मोदींकडे या पत्राद्वारे करण्यात आली आहे. मराठा समाजाला शिक्षणात १२ टक्के आणि सरकारी नोकरीत १३ टक्के आरक्षण देण्याची मागणी पत्राद्वारे करण्यात आली आहे.
दरम्यान, मराठी आरक्षणासाठी राज्य सरकारनं आजवर केलेल्या प्रयत्नांची सविस्तर माहिती सुद्धा मुख्यमंत्र्यांनी आपल्या पत्रातून पंतप्रधानांना दिली आहे. यात सरकारनं आणलेला अद्यादेश, गायकवाड आयोग, विधीमंडळात केलेला कायदा अशी सर्व माहिती देण्यात आली आहे.





