नवी मुंबई विमानतळावर डिजीयात्रा प्रणालीची सुरुवात; ई-गेटद्वारे प्रवेश प्रक्रिया सुरू

नवी मुंबई : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर ‘डिजीयात्रा’ प्रणालीची सुरुवात करण्यात आली असून, देशव्यापी विस्तार मोहिमेचा भाग म्हणून या सुविधेचा समावेश करण्यात आला आहे. शुक्रवारी झालेल्या राष्ट्रीय कार्यक्रमानिमित्त विमानतळाच्या टर्मिनलमध्ये उद्घाटन सोहळ्याचे थेट प्रक्षेपण करण्यात आले. यावेळी तीन प्रवाशांनी बायोमेट्रिक ई-गेटमधून प्रवेश करून प्रणालीची प्रतीकात्मक सुरुवात केली.
देशातील काही प्रमुख विमानतळांवर ही सुविधा आधीपासून कार्यरत आहे. त्या पार्श्वभूमीवर नवी मुंबई विमानतळाचाही या प्रणालीत समावेश करण्यात आला आहे. सध्या विमानतळावरील नियमित व्यावसायिक उड्डाणे पूर्ण क्षमतेने सुरू झालेली नसली, तरी प्रवासी वाहतूक वाढल्यानंतर या प्रणालीचा व्यापक वापर अपेक्षित आहे. प्रत्यक्ष प्रवासी संख्येत वाढ झाल्यानंतरच तिची गती, अचूकता आणि व्यवहार्यता स्पष्ट होणार आहे.
डिजिटल ओळखीवर आधारित प्रणाली असल्याने माहिती सुरक्षेबाबत प्रश्न उपस्थित होण्याची शक्यता नाकारता येत नाही. संबंधित अधिकाऱ्यांकडून आवश्यक तांत्रिक उपाययोजना आणि गोपनीयतेचे निकष पाळले जात असल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र, प्रवाशांचा अनुभव आणि प्रणालीतील तांत्रिक सुसूत्रता यावरच या उपक्रमाचे यश अवलंबून राहील.
हेही वाचा – ‘पर्यावरणविषयक मोहिमेची कृषी क्षेत्राशी सांगड घालावी’; राज्यपाल आचार्य देवव्रत
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हा अदानी एअरपोर्ट होल्डिंग लिमिटेड समूहाच्या ताफ्यातील ग्रीनफिल्ड प्रकल्प आहे. या समूहाकडे मुंबई विमानतळासह देशातील अन्य विमानतळांचे संचालन आहे. विमानतळ प्रक्रियेचे डिजिटलकरण करण्याच्या व्यापक धोरणात ‘डिजीयात्रा’ला महत्त्वाचा टप्पा मानले जात आहे.
‘डिजीयात्रा’ ही प्रवाशांच्या डिजिटल ओळखीवर आधारित व्यवस्था आहे. प्रवाशांनी आगाऊ नोंदणी केल्यानंतर त्यांची माहिती प्रणालीशी जोडली जाते. विमानतळावर प्रवेश करताना ई-गेटसमोर उभे राहिल्यावर चेहऱ्याच्या आधारे ओळख पडताळली जाते आणि पडताळणी यशस्वी झाल्यास प्रवेश दिला जातो. त्यामुळे बोर्डिंग पास आणि ओळखपत्र वारंवार तपासण्याची आवश्यकता कमी होते. प्रवेशद्वार, सुरक्षा तपासणी आणि बोर्डिंगपूर्व टप्पे अधिक जलद पार पडावेत, हा या व्यवस्थेमागील उद्देश आहे.




