शरद पवारांनी केलेली ‘ती’ मागणी देवेंद्र फडणवीसांनी केली मान्य; केली मोठी घोषणा

मुंबई : आज मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये दख्खनचा उठाव आणि सहकाराची मुहूर्तमेढ घटनेच्या 150 वर्षपुर्तीनिमित्त ‘सहकाराचे सक्षमीकरण आणि राज्य शासनाचे धोरण’ विषयावरील परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात बोलताना शरद पवार यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सहकारी संस्थांसाठी एक विनंती केली. यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी ती तात्काळ मान्य केली.
गेल्या काही वर्षांमध्ये राज्यातील सहकारी साखर कारखान्यांची संख्या कमी झाली आहे. आधी 80 टक्के सहकारी कारखाने होते आणि 20 टक्के खासगी कारखाने होते. आता 50 टक्के खासगी कारखाने झाले आहेत. त्यामुळे या सर्वांचा अभ्यास करणे गरजेचे आहे. त्यासाठी एक कमिशन अपॉइंट करा आणि या सहकारी संस्थाचा अभ्यास करा, नेमक्या काय अडचणी आहेत हे समजून घ्या अशी विनंती शरद पवारांनी देवेंद्र फडणवीसांना केली.
हेही वाचा – मंत्री गिरीश महाजन यांना ‘त्या’ प्रकरणी उच्च न्यायालयाकडून दिलासा
फडणवीस यांनी तत्काळ शरद पवार यांनी केलेली ही मागणी मान्य केली. सहकारी संस्थांच्या बळकटीकरणासाठी आम्ही एक समिती स्थापन करु आणि त्याचा अभ्यास करु असे फडणवीस यांनी यावेळी जाहीर केले. तसेच देशात नरेंद्र मोदी यांचे सरकार आल्यानंतर पहिल्यांदा सहकार विभागच वेगळं मंत्रालय करण्यात आले. अमित शाह यांच्या हातात याची जबाबदारी दिली. मोठ्या प्रमाणात त्यामुळे सहकार क्षेत्रात आपण पुढे गेलो आहोत असा दावादेखील फडणवीसांनी केला.
आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने शरद पवार व अजित पवार दोघेही एकत्र आले होते. विशेष म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवार व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दोघांच्या मध्ये शरद पवार यांची खूर्ची होती. त्यामुळे पुन्हा एकदा दोन्ही पवार एकत्र येण्याच्या चर्चेला उधाण आले. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरीदेखील उपस्थित होते.