भिवापूर तालुक्यातील धामणगाव येथे भीषण आग; निम्म्या गावाची राखरांगोळी, अनेक जनावरांचा मृत्यू

नागपूर : जिल्ह्यातील भिवापूर तालुक्यातील धामणगाव विद्यामंदिर येथे भीषण आगीत निम्म्या गावाची राखरांगोळी झाली. या आगीत शेतकऱ्यांच्या गोठ्याला बांधलेली जनावरे दगावली असून अनेकांची घरे जळाल्याने संसार उद्ध्वस्त झाले. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून जिल्ह्यातून सर्वच भागातून अग्निशमन बंब पोहोचले असून आगीवर नियंत्रणाचे प्रयत्न सुरू आहे.
धामणगाव विद्यामंदिर या गावाला लागूनच शेती आहे. शेतीमध्ये एका व्यक्तिने पालापाचोळा जाळला. सायंकाळी आलेल्या सोसाट्याच्या वाऱ्याने जळालेला पालापाचोळा गावापर्यंत पोहोचला. उन्हाळा असल्याने अनेकांनी घरासमोर लाकडे जमा गोळा केली होती. त्यामुळे आगीने वेग घेतला. बघता बघता निम्म्या गावातील मातीची व कवेलू घरांना आगीने कवेत घेतले. घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार अचानक लागलेल्या आगीने काही वेळातच भीषण रूप धारण केले व वाऱ्याच्या वेगामुळे आग झपाट्याने संपूर्ण गावात पसरली अनेक कुटुंबांना आपले संसार वाचवण्यास वेळच मिळाला नाही. घरातील धान्य, कपडे व इतर जीवनावश्यक साहित्याची जळून राखरांगोळी झाली.
हेही वाचा – ‘विकसित भारताच्या स्वप्नपूर्तीमध्ये नारीशक्तीचा सहभाग महत्त्वाचा’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
या आगीत गायी, बैल, शेळ्या आदी जनावरेही मोठ्या प्रमाणात मृत्यूमुखी पडल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे शेती व्यवसायावर अवलंबून असलेल्या नागरिकांचे आर्थिक नुकसान प्रचंड झाले आहे. अनेक कुटुंबे अक्षरशः उघड्यावर आली असून त्यांच्यासमोर निवारा व अन्नाचा प्रश्न निर्माण झाला आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन व अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला. मात्र तोपर्यंत मोठे नुकसान झाले होते. ग्रामस्थांनीही स्वतःच्या परीने आग विझवण्याचा प्रयत्न केला. दरम्यान या घटनेमुळे संपूर्ण गाव हादरले असून तातडीने पंचनामा करून बाधित कुटुंबांना आर्थिक मदत देण्याची मागणी केली जात आहे.





