थंडीचा कडाका! पुण्यात विक्रमी नीचांकी तापमानाची नोंद, परभणीचे तापमान 7 अंशावर

पुणे : राज्यातील बहुतांश शहरांमध्ये थंडीची लाट पसरली असून पारा एक एक अंकी आकड्यावर येऊन पोहचला आहे. अशातच आता पुण्यात तीन वर्षांनी विक्रमी नीचांकी तापमानाची नोंद झाली आहे. पुणे शहराच्या किमान तापमानाने एक अंकी आकडा गाठला असून पुणे शहराचं तापमान सरासरी 9.4 अंशावर येऊन पोहचलंय. पुण्यात मागील काही दिवसांपासून 10 अंश तापमान होतं, मात्र काल (18 नोव्हेंबर) पुण्यात 9.4 अंश तापमानाची नोंद झाली आहे. दरम्यान आगामी काळात तापमानाचा पारा आणखी घटण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. तर लोणी काळभोर येथे 6.9 इतक्या सर्वात नीचांकी तापमानाची नोंद झाली आहे.
पुणे शहरात गेल्या काही दिवसांपासून किमान तापमानात मोठी घट होत असल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे थंडीचा कडाका वाढला असून, पुढील दोन ते तीन दिवसांत तापमानात कमी-जास्त होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. पुणे शहराच्या किमान तापमानाने एक अंकी आकडा गाठला आहे. पुणे शहराचं तापमान सरासरी 9.8 अंशावर आलं आहे. पुण्यात मागील काही दिवसांपासून 10 अंश तापमान होतं, मात्र काल पुण्यात 9.8 अंश तापमानाची नोंद झाली आहे.
दुसरीकडे कोकणातही थंडीचा जोर वाढल्याचे चित्र आहे. रत्नागिरीच्या दापोली गारठली असून तापमानाचा पारा 8 अंशावर पोहचला आहे. सध्या कोकणात कडाक्याची थंडी जाणवायला लागली असून दापोली गारठली आहे. दापोलीत यंदाच्या हिवाळ्यातील सर्वात कमी 8°C तापमानाची नोंद झाली. किमान–कमाल तापमानात तब्बल 22 अंशांची तफावत नोंदवली आहे. कोकणातील ‘महाबळेश्वर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दापोलीत तीव्र गारठा जाणवत असून परिसर अक्षरशः गारठला आहे. तर सिंधुदुर्गात 14 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.
हेही वाचा – छोटे भूखंड करणार विनाशुल्क नियमित; राज्यातील तीन कोटी नागरिकांना लाभ
परभणी शहरासह जिल्हाभरामध्ये मागच्या आठवडाभरापासून थंडीची लाट कायम आहे. आज जिल्ह्याचे तापमान हे 7 अंश सेल्सिअस एवढे नोंदवण्यात आले आहे, जे यंदाच्या मोसमातील सर्वात नीचांकी तापमान आहे. मागच्या आठवडाभरापासून जर बघितलं तर परभणी जिल्ह्याचे तापमान हे सातत्याने दहा अंशाखालीच आहे. त्यामुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर थंडीचा कडाका जाणवतोय. दिवसभर हवेतील गारवा कायम राहत असल्यामुळे परभणीकरांना अक्षरशः हुडहुडी भरली आहे. ग्रामीण भागासह शहरात ठिकठिकाणी शेकोट्या पेटत आहेत. उबदार कपड्यांचा वापर ही केला जातोय.
गोंदिया जिल्ह्यात मागील 3 ते 4 दिवसांपासून थंडीचा जोर चांगलाच वाढलेला आहे. तापमानात अचानक घट झाल्याने नागरिकांना कडाक्याच्या थंडीचा सामना करावा लागत आहे. आज मात्र परिस्थिती आणखी गडद झाली. गोंदिया जिल्ह्यातील देवरी शहरासह परिसरात सकाळच्या सुमारास दाट धुक्याने अक्षरशः चादर पांघरली होती. रस्त्यावर काही मीटर अंतरावरही पुढील व्यक्ती किंवा वाहन स्पष्ट दिसत नव्हते. तर देवरी येथील नगरपंचायत मैदानावर मॉर्निंग साठी आलेल्या नागरिकांना गुलाबी थंडी अन् दात धुके असे मनमोहक दृश्य अनुभवायला मिळाले.





