विद्यादीप बालगृह प्रकरणावर मुख्यमंत्र्यांकडून कारवाईचे आदेश; अधिकाऱ्यांचे ताक्ताळ निलंबन

Devendra Fadnavis : छत्रपती संभाजीनगरच्या विद्यादीप बालगृह प्रकरणाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गंभीर दखल घेत संबंधीत अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश दिले आहेत. जिल्हा बालविकास अधिकारी यांचं तात्काळ निलंबित करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.
विद्यादीप बालगृहातून नऊ मुली पळून गेल्याची घटना सोमवारी घडली. त्यावेळी या मुलींचा छळ झाल्याचे समोर आले होते. आज या प्रकरणी विधिमंडळात विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी प्रश्न उपस्थित केला. यावर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “ज्या काही अनियमितता बाहेर आल्या आहेत त्या भयानक आहेत. जिल्हा बालविकास अधिकारी तात्काळ निलंबित करण्यात येत आहे. याप्रकरणी पोलिसांनी 80 मुलींची चर्चा केली, आधी त्या बोलत नव्हत्या.
हेही वाचा – ‘मुंबईतील विमानतळाच्या फनेल झोनमधील रखडलेल्या इमारतींचा लवकरच पुनर्विकास’; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मात्र आता त्या त्यांच्यासोबत काय घडलं हे सांगत आहेत. अनेक गंभीर गोष्टी यातून बाहेर आल्या आहेत. बालगृह अधीक्षक आणि सगळ्यांवर पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. संस्थेची मान्यता पूर्ण रद्द करण्यात आली आहे. ३ वरिष्ठ महिला पोलीस निरीक्षक याबाबत चौकशी करत आहेत. उद्या याबाबत अहवाल देणार आहेत. जे कुणी दोषी असेल त्या सगळ्यांवर कारवाई होईल. हायकोर्ट सुद्धा लक्ष ठेवून आहे, त्यांनी सुमोटो दाखल करून घेतला आहे.”
बालगृहातील मुलींचे कुठल्याही कारणाने पोट दुखले तरी प्रेग्नन्सी टेस्ट केली जात होती. मुली आजारी पडल्यावर त्यावर उपचार म्हणून एकाच प्रकारची गोळी दिली जात होती. त्यामुळे मुली अनेक दिवस एकाच आजाराने ग्रासलेल्या राहायच्या. त्यानेदेखील मुली बऱ्या झाल्या नाही तर पवित्र पाणी शिंपडून अथवा शरीरावर वेगळी चिन्हे काढून त्यांना आता तुम्ही बऱ्या व्हाल असा दावा केला जायचा.




