राज्यात मध्यावधी निवडणुकांची शक्यता, तयारीला लागा; उद्धव ठाकरेंचे आदेश

मुंबई । महाईन्यूज । विशेष प्रतिनिधी ।
राज्यात मध्यावधी निवडणुका लागण्याची शक्यता असल्याचं भाकीत शिवसेने नेते उद्धव ठाकरे यांनी संपर्क प्रमुखांच्या बैठकीत केले आहे. यावेळी त्यांनी कार्यकर्ते आणि नेत्यांना निवडणुकीच्या तयारीला लागण्याचे आदेशही दिले आहेत. शिवसेना नेत्या मनिषा कायंदे यांनी याबाबत माहिती दिली आहे. दरम्यान उद्धव ठाकरेंच्या या वक्तव्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
आज दादर येथील शिवसेना भवनात उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील सर्व संपर्कप्रमुखांची बैठक पार पडली. या बैठकीत उद्धव ठाकरेंनी कार्यकर्त्यांना तयारीला लागा, मध्यावधी निवडणुका कधीही लागू शकतात, कार्यकर्त्यांपर्यंत जा… असे आदेश दिले आहेत. दरम्यान राज्यातील राजकीय परिस्थिती अस्थिर आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही मोठ मोठ्या घोषणा करायला सुरुवात केली आहे. राज्यात कधीही मध्यावधी निवडणुका लागतील. आपल्याला प्रत्येकाच्या घराघरात पोहचला हवं, आपला मुख्यमंत्री असताना केलेले काम घराघरात पोहोचवा, राज्यात मध्यावधी निवडणुका लागतील, त्याला तयार राहा अशी सुचना उद्धव ठाकरे यांनी विधानसभा संपर्क प्रमुखांना दिल्या आहेत.
मनिषा कायंदे म्हणाल्या की, शिवसेनेची पहिल्यापासूनची बांधणी अशी आहे की, मुंबईतील जे पदाधिकारी आहेत त्यांना जे पक्षाचे महत्वाचे निरोप असतात ते संपर्क प्रमुखांना पाठवले जातात. त्यानुसार आजची बैठक होती. पंतप्रधान मोदींनी महाराष्ट्रासाठी काही खास पॅकेज जाहीर केले आहे, यामुळे महाराष्ट्रात मध्यावती निवडणूक जाहीर होण्याची शक्यता उद्धव ठाकरेंनी वर्तवली आहे. कायम महाराष्ट्र – गुजरात असा वाद निर्माण करुन भाजपकडून मतांचं राजकारण केलं जात आहे, असा आरोपही कायंदे यांनी केला आहे.
यावर शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के म्हणाले की, एकंदरीत परिस्थिती पाहता उद्धव ठाकरेंनी पक्षाचा आढावा घेण्याचं काम सुरु केलं आहे. पण आता जनतेत जाऊन काम करणारे नेते पक्षात राहिले नाहीत, हे लक्षात आल्याने राहिलेले नेतेही जाण्याच्या वाटेवर आहेत.त्यामुळेच पक्षाला जोडून ठेवण्यासाठी उद्धव ठाकरेंनी मध्यावधी निवडणुकांबाबत वक्तव्य केलं आहे. हे अस्थिर सरकार आहे, टिकणार नाही, अशा अफवा सुरु आहेत. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतील 15 आमदारांपैकी अनेकजण आमच्या संपर्कात आहेत, असा दावाही यावेळी म्हस्के यांनी केला.