महाराष्ट्रातील आणखी एका शहराचे नाव बदललं, इस्लामपूर आता ईश्वरपूर

मुंबई | महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर शहराचे नाव बदलून आता ईश्वरपूर करण्यात येणार आहे. हा निर्णय राज्य सरकारने गुरुवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेतला असून, शुक्रवारी राज्य विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी याची घोषणा करण्यात आली.
राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी विधानसभेत सांगितले की, इस्लामपूरचे नाव ईश्वरपूर करण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवण्यात येणार आहे. केंद्र सरकारच्या मंजुरीनंतर या नामकरणाला अंतिम स्वरूप मिळेल.
हेही वाचा : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे बेरोजगारांसाठी “भव्य नोकरी महोत्सव”
हा बदल हिंदुत्ववादी संघटना शिव प्रतिष्ठानच्या मागणीनंतर करण्यात आला आहे. शिव प्रतिष्ठानने सांगली जिल्हा कलेक्टरेटला निवेदन सादर करून इस्लामपूरचे नाव ईश्वरपूर करण्याची मागणी केली होती. या संघटनेचे नेतृत्व संभाजी भिडे करतात, ज्यांचे समर्थक या मागणीसाठी गेल्या अनेक वर्षांपासून आग्रही होते.
यापूर्वी महाराष्ट्र सरकारने औरंगाबादचे नाव छत्रपती संभाजी नगर, उस्मानाबादचे नाव धाराशिव आणि अहमदनगरचे नाव अहिल्यानगर असे बदलले आहे.





