अलमट्टी उंचीविरोधात कोल्हापुरात रविवारी सर्वपक्षीय मेळावा

कोल्हापूर : कर्नाटक राज्य शासनाने अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे पश्चिम महाराष्ट्राला महापुराचा धोका वाढला आहे. कर्नाटक शासनाचे हे प्रयत्न हाणून पाडण्यासाठी रविवारी दुपारी एक वाजता सर्वपक्षीय मेळाव्याचे आयोजन केले आहे. खासदार, आमदारांसह सहकारी संस्थांचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती महाराष्ट्र राज्य इरिगेशन फेडरेशनचे जिल्हाध्यक्ष विक्रांत पाटील-किणीकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
हेही वाचा – “ओबीसी समाज जास्त आरक्षण घेत होता आता….”; जातनिहाय जनगणनेवर मनोज जरांगेंचं सर्वात मोठं विधान
त्यांनी सांगितले की, अलमट्टी धरणाच्या उंचीबाबत नेमलेल्या लवादानेही उंची वाढवण्यास हिरवा कंदील दाखवला आहे, त्याचा अहवाल प्रसिद्ध करू नये, असे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले आहे. कर्नाटक शासन उंची वाढवण्यावर ठाम असून, आंध्र प्रदेश व तेलंगणा राज्याने याविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केल्याने हे काम थांबले आहे. कोणत्याही परिस्थितीत धरणाची उंची वाढवू देणार नाही, त्यासाठी संघर्षाची भूमिका घेतली जाईल. आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी रविवारी सर्वपक्षीय मेळाव्याचे आयोजन केल्याचे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य बाबासाहेब देवकर यांनी सांगितले.
मेळाव्याला खासदार शाहू छत्रपती, धैर्यशील माने, धनंजय महाडिक यांच्यासह बाधित तालुक्यांतील आमदार, कोल्हापूर चेंबर ऑफ काॅमर्स, ग्रीन मर्चंट असोसिएशन, कोल्हापूर धान्य व्यापारी संघटना, शेतकरी संघटना, सहकारी संस्थांचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.