महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये रमजान ईदनिमित्त 2 दिवस खरेदी करण्याची सुट
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/05/Ramadan-Grocery-Kirana-e1620697523539.jpg)
लातूर – महाराष्ट्रात कोरोना रुग्णसंख्या वाढल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात कडक निर्बंध लागू करून वीकेंड लॉकडाऊनसह कडक संचारबंदीचे आदेश दिले आहेत. लातूरमध्येही स्थानिक प्रशासनाने 8 ते 13 मे पर्यंत कडक लॉकडाऊनचे आदेश दिले होते. तसेच सोलापुरातही स्थानिक प्रशासनातर्फे लॉकडाऊन करण्यात आला होता.
सध्या मुस्लिम बांधवांसाठी पवित्र समजला जाणारा रमजान महिना सुरू आहे आणि रमजान ईदही येऊन ठेपली आहे. त्याच पार्श्वभूमीवर लातूर तसेच सोलापूर जिल्ह्यामध्ये 11 व 12 मे रोजी दोन दिवसांसाठी रमजान ईद निमित्त खरेदी करण्यासाठी सूट देण्यात आली आहे. तसेच लॉकडाऊनमध्ये नागरिकांना जीवनावश्यक वस्तू खरेदीसाठी सूट दिली गेली आहे.[
लातूर तसेच सोलापूर जिल्ह्यामध्ये किराणा सामान, दूध व इतर जीवनावश्यक वस्तूंची दुकानं ही पूर्णपणे बंद करण्यात आली होती. फक्त दूध आणि खाद्यपदार्थ घरपोच पुरवण्यास परवानगी दिली गेली होती. तसेच आता लातूरचे जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी यांनी जारी केलेल्या आदेशानुसार 11 व 12 मे रोजी सकाळी 7 ते दुपारी 12 वाजेपर्यंत ईदच्या निमित्ताने नागरिकांना किराणा, भाजीपाला व चिकन-मटणची खरेदी करता येणार आहे.
सोलापूरमध्ये किराणा सामान व इतर जीवनावश्यक वस्तूंची दुकानं सकाळी 7 ते 11 वाजेपर्यंत उघडी ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. तसेच 12 मे च्या दुपारनंतर या दोन्ही जिल्ह्यांमध्ये पुन्हा एकदा कडक लॉकडाऊन लागू होणार आहे. ईद निमित्त सूट मिळाल्याने नागरिकांमध्ये समाधानाचं वातावरण पाहायला मिळत आहे.