breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

विधानसभा निवडणुक, मुख्यमंत्री काढणार महाजनादेश यात्रा

मुंबई – लोकसभा निवडणुकीतील बंपर यशानंतर आता या यशाची आगामी विधानसभा निवडणुकीतही पुनरावृत्ती करण्यासाठी भाजपाने कंबर कसली आहे. एकीकडे संघटनात्मक पातळीवर इतर पक्षातील नेत्यांचे पक्षप्रवेश, बैठका, कार्यकर्त्यांशी संवाद या माध्यमातून पक्षाचा पाया भक्कम करण्याचे काम सुरू आहे. तर दुसरीकडे आता मतदारांना आकर्षित करण्यासाठी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आखाड्यात उतरणार असून, महाजनादेश यात्रेच्या माध्यमातून ते राज्य पिंजून काढणार आहेत.

भाजपाची महाजनादेश यात्रा 1 ते 31 ऑगस्टदरम्यान चालणार आहे. यादरम्यान मुख्यमंत्री राज्यातील विविध भागांना भेट देणार आहे. तसेच आपल्या सरकारने राबवलेल्या योजनांची माहिती मुख्यमंत्री मतदारांना देणार आहेत. तसेच या योजनांचा लाभ मिळालेल्या लाभार्थ्यांचीही भेट मुख्यमंत्री घेतील. या महाजनादेश यात्रेमध्ये मुख्यमंत्र्यांसोबत भाजपाचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे देखील सहभागी होणार आहेत. एकीकडे शिवसेनेने आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली जनआशीर्वाद यात्रा सुरू केली आहे. त्यापार्श्वभूमीवर भाजपानेही मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी महाजनादेश यात्रा काढण्याचे निश्चित केले आहे.

दरम्यान, भाजपाचे कार्यकारी अध्यक्ष जे.पी. नड्डा हे आज मुंबईत असून, त्यांच्यासोबत भाजपाच्या नेत्यांची महत्त्वाची बैठक होणार आहे. तत्पूर्वी शनिवारी भाजपचे प्रदेश पदाधिकारी आणि जिल्हाध्यक्षांच्या बैठकीत नड्डा यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. ”मी पंचवीस वर्षे पक्षाचे काम करतो, तीस वर्षे पक्षाचे काम करतो असे स्वत:ला मिरवण्यापेक्षा एवढ्या वर्षात तुम्ही पक्षाला काय दिलं याचा विचार करा आणि ‘रिझल्ट ओरिएन्टेड’ काम करा अशा कानपिचक्या त्यांनी दिल्या. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, महाराष्ट्राचे प्रभारी सरोज पांडे,माजी पक्षाध्यक्ष व केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे प्रामुख्याने उपस्थित होते.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button