बिल्डरच्या चुकीमुळे ६० कुटुंबे अंधारात
- चोरून दिलेली वीजजोडणी महावितरणने कापली; दोन महिन्यांपासून रहिवासी अंधारात
बांधकाम व्यावसायिकाने परवाना न घेता इमारतीत चोरीचा वीजमीटर लावल्याचा फटका कारगिलनगरमध्ये असलेल्या एका इमारतीतील रहिवाशांना बसला आहे. महावितरणने या इमारतीचा वीजपुरवठा खंडित केल्याने इमारतीतील ६० कुटुंबे दोन महिन्यांपासून अंधारात राहत आहेत.
वसई-विरार शहरात अनधिकृत इमारतींचे पेव फुटले असून बांधकाम व्यावसायिकांकडून रहिवाशांची फसवणूक केली जात आहे. अनेक इमारतींना तर भोगवटा प्रमाणपत्र नसल्याने रहिवाशांना शास्ती भरावी लागत आहे. विरारच्या कारगिलनगर येथे सम्यक नावाच्या एका इमारतीचा वीजपुरवठा बांधकाम व्यावसायिकाच्या चुकीमुळे खंडित करण्यात आला. आठ वर्षे जुनी असलेल्या या इमारतीत ६० कुटुंबे राहतात. या इमारतीच्या विकासक नरेश मोरे याने घराचा ताबा दिल्यानंतर त्यांना वीजमीटर आणि प्रतिपाळ देयकासाठी (मेंटेनन्स) प्रत्येक घरामागे पाच हजार रुपये इतकी रक्कम घेतली होती. परंतु अधिकृत वीज मीटर न लावता एकाच व्यावसायिक मीटरमधून येथील कुटुंबांना वीज दिली जात होती. मागील आठ वर्षे हा प्रकार सुरू होता. याची माहिती महावितरण विभागाला समजल्यानंतर त्यांनी तेथील वीजजोडणी काढून टाकली आहे. त्यामुळे येथील रहिवासीयांना दोन महिन्यांपासून अंधारातच राहावे लागत आहे.
गेल्या दोन महिन्यांपासून वीज नसल्याने येथील नागरिकांचे हाल होत आहेत. विजेची उपकरणे बंद असल्याने गृहिणींना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे, तर विद्यार्थ्यांना मेणबत्तीच्या प्रकाशात अभ्यास करावा लागत आहे, अशी माहिती येथील रहिवाशांनी दिली.
आठ वर्षांपूर्वी या इमारतीमध्ये विकासकाने महावितरण विभागाकडून वीज मीटर घेतले होते. या एकाच मीटरमधून या सर्व घरांना वीज देण्यात आली होती. मात्र वीज देयक काही महिन्यांपासून थकीत असल्याने महावितरण विभागाने वीज मीटर काढून टाकले असून विकासकावर वीजचोरी केल्याचा आरोप महावितरणने केला आहे.
गृहिणींना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे, तर विद्यार्थ्यांना मेणबत्तीच्या प्रकाशात अभ्यास सामना करावा लागत आहे, तर विद्यार्थ्यांना मेणबत्तीच्या प्रकाशात अभ्यास
आता या इमारतीमधील ६० कुटुंबांना महावितरणाने साडेतीन लाख रुपयांची थकबाकी दंडासह दाखवली आहे. जोपर्यंत थकीत वीजदेयक भरले जात नाही, तोपर्यंत वीजजोडणी दिली जाणार नाही.
– दिनेश अग्रवाल, अधीक्षक अभियंता, महावितरण
या इमारतीत राहणारी सर्व कुटुंबे मध्यमवर्गीय आहेत. त्यांना एकत्रित एवढी मोठी रक्कम भरणे शक्य नाही. आमचा दोष नसताना आमच्यावर ही वेळ आली आहे.
– नरेश शेतकर, रहिवासी