आज आहे दीप अमावस्या; पहा काय आहे महत्त्व

महाराष्ट्रामध्ये आज म्हणजे 20 जुलै रोजी दीप अमावस्या साजरी केली जात आहे. आषाढ महिन्याच्या शेवटच्या दिवशी दीप अमावस्या साजरी करून श्रावण महिन्याचं स्वागत करण्यासाठी सारे सज्ज होतात. दरम्यान दीप अमावस्येला घरातील सारे चांदी, पितळेचे दीवे, दीप, निरंजन घासून पुसून स्वच्छ केले जातात. संध्याकाळी त्याची पूजा केली जाते. या पूजेमध्ये कणकेच्या दिव्यालाही महत्त्व असते. सायंकाळी कणकेचे 11, 21 दिवे बनवले जातात.नैवेद्याला दाखवलेले हे गोड कणकेचे दिवे नंतर खाल्ले जातात. तर जाणून घेऊयात दीप अमावस्या साजरी कशी करायची आणि दीप पूजनामध्ये आवश्यक असणारे कणकेचे दिवे कसे बनवायचे ?

काळोखी आषाढ महिन्यातील दिवसांना अलविदा म्हणत सण, उत्सव, व्रत वैकल्यांच्या श्रावण महिन्याचं स्वागत केलं जातं. यंदा महाराष्ट्रामध्ये 21 जुलै पासून श्रावण महिन्याला सुरूवात होणार आहे. मात्र त्यापूर्वी आज दीर्घायुष्यासाठी, घरात सुख, समृद्धी, मांगल्य नांदावं म्हणून सायंकाळी दिव्यांचं पूजन करायला विसरू नका.
कणकेचे गोड दिवे गव्हाचं पीठ, रवा आणि गूळ यांच्या मिश्रणाने केले जातात. मोदकाप्रमाणे कणकेचे दिवे बनवण्यासाठी गव्हाच्या पीठाला दिव्यांच्या आकारामध्ये बनवले जाते. त्यामध्ये तूपाची वात लावून दिवे पेटवले जातात. त्यानंतर हे गोड दिवे खाण्याची देखील प्रथा आहे.
दीप अमावस्या ही सोमवती अमावस्या म्हणून देखील ओळखली जाते. यंदा कोरोना संकटामुळे सोमवती अमावस्या निमित्त खंडेरायाची यात्रा रद्द झाली आहे. दरम्यान यंदा सारेच सण घरच्या घरी साजरे करण्याचं आवाहन नागरिकांना करण्यात आलं आहे.




