महाराष्ट्र -कर्नाटक वाद चिघळला, दोन्ही राज्यातील एसटी सेवा बंद
बेळगाव – महाराष्ट्र -कर्नाटक वाद पुन्हा एकदा चिघळला आहे. दोन्ही राज्यांकडून एसटीची वाहतूक बंद करण्यात आली आहे. अज्ञात व्यक्तीकडून महाराष्ट्र बसवर दगडफेक करण्यात आली होती. कोल्हापुरातील मध्यवर्ती बसस्थानकात हा प्रकार घडला. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून दोन्ही राज्यातील एसटी वाहतूक बंद करण्यात आली.
महाराष्ट्र-कर्नाटक या दोन राज्यातील वाद आता विकोपाला गेला आहे. कर्नाटकातील मराठी भाषिकांना अद्यापही डावललं जातंय. त्यातच, कोल्हापुरातील मध्यवर्ती बसस्थानकात महाराष्ट्र एसटी बसवर अज्ञाताने दगडफेक केली. हा व्यक्ती कन्नड रक्षण वेदिकेचा कार्यकर्ता असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. त्याने महाराष्ट्र बसवर हल्ला केल्यानंतर शिवसेनेने कोल्हापुरातील कर्नाटक बस रोखून धरली होती.
बेळगावमध्ये कन्नड संघटनेच्या कार्यकर्त्यांनी शिवसेना जिल्हाप्रमुख प्रकाश शिरोळकर यांच्या कारवर हल्ला केल्यानंतर महाराष्ट्र-कर्नाटक राज्यातील वाद पुन्हा चिघळला आहे. बेळगावात कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी काल जिल्हाप्रमुखाच्या गाडीवर हल्ला केला आणि गाडीवरील झेंडा काढून कारची तोडफोड केली. त्यानंतर कोल्हापुरात शिवसैनिक आक्रमक झाले. शिवसैनिकांनी कोल्हापूर बस स्थानकावर आंदोलन करत कर्नाटक राज्याची बससेवा बंद केली. शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी करत कन्नड संघटनेच्या आंदोलनाला प्रत्युत्तर दिलं.
या घटनेनंतर कोल्हापूर बस स्थानकावरील महाराष्ट्राच्या बसवर आज पहाटे कर्नाटकमधील एका नागरिकाने दगडफेक केली. यामध्ये गाडीचे नुकसान झाले असून दगडफेक करणाऱ्या व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू झाले आहे. आज पुन्हा असा प्रकार घडू नये याच्यासाठी महाराष्ट्रातून कर्नाटकमध्ये एकही बस सोडली जाणार नाही. तर कर्नाटकमधून एक दिवस महाराष्ट्रात येणार नाही.