चिंचवड, कर्जत रेल्वे स्थानकावर लांब पल्ल्याच्या गाड्यांना थांबा मिळणार, पासची सुविधाही सुरु होणार – श्रीरंग बारणे
पिंपरी चिंचवड | मावळ लोकसभा मतदारसंघातील चिंचवड आणि कर्जत रेल्वे स्थानकावर लांब पल्ल्यांच्या काही गाड्यांचा थांबा पुन्हा सुरु होणार आहे. तसेच पुणे-मुंबई-पुणे दरम्यान प्रवास करणा-या नागरिकांसाठी महिना, तीन महिन्याचा पास मिळण्याची सुविधा पुन्हा सुरु होणार असल्याची माहिती शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी दिली. रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी संबंधित अधिका-यांना अशा सूचना दिल्याचे बारणे यांनी सांगितले.
चिंचवड, कर्जत स्थानकावर लांब पल्ल्याच्या गाड्यांना पुन्हा थांबा देण्याबाबत आणि पासची सुविधा सुरु करण्यासाठी खासदार बारणे यांनी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची भेट घेतली. नागरिकांना येणा-या अडचणी त्यांना सांगितल्या. खासदार बारणे म्हणाले, मावळ लोकसभा मतदारसंघातील चिंचवड आणि कर्जत रेल्वे स्थानकावर कोरोना काळानंतर रेल्वे गाड्या थांबत नाहीत. त्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. या दोन स्थानकांवर गाड्यांना थांबा देण्याची मोठी आवश्यकता आहे. मावळ लोकसभा मतदारसंघातील नागरिक मोठ्या संख्येने नोकरीनिमित्त मुंबई, पुण्यात जातात. कोरोनानंतर चिंचवड, कर्जत रेल्वे स्थानकावर गाड्या थांबत नसल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. त्यामुळे या दोन स्थानकांवर गाड्या थांबविण्याची विनंती बारणे यांनी केली.
कोरोना कालावधीनंतर पूर्वीप्रमाणे रेल्वे गाड्या धावू लागल्या. आरक्षित तिकीटा बरोबर ऐनवेळी तिकीट काढणा-यां नाही रेल्वे प्रवासाची मुभा दिली. एमएमआरडीए क्षेत्रामध्ये सीएसटीएम ते कसारा, कर्जत, खोपोली, सीएसटीएम ते पेन, रोहा, चर्चगेट, ढहाणू या मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावरुन जाणा-या सर्व गाड्यांनी कर्जतवरील थांबा बंद केला आहे. त्यामुळे नागरिकांना रेल्वेगाडी पकडण्यात अनंत अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्याचबरोबर रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातीलही रेल्वे थांबा बंद केला आहे. दादर-रत्नागिरी दरम्यान धावणा-या रेल्वे गाड्यांचाही थांबा बंद केला. अशाप्रकारे मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या माध्यमातून प्रवाशांना त्रास दिला जात आहे.
पूर्वी डेक्कन एस्कप्रेस चिंचवड आणि कर्जत रेल्वे स्थानकावर थांबत होती. आता त्याचा थांबा लोणावळा केला आहे. त्यामुळे कर्जत स्थानकावरील नागरिकांना रेल्वे पकडण्यासाठी कल्याण, बदलापूर स्थानकावर जावे लागत आहे. मध्य रेल्वे प्राधिकरणाने अनेक रेल्वेचा चिंचवड, कर्जत येथील थांबा बंद केला आहे. दुस-या पाळीत (शिफ्ट) काम करणा-या नागरिकांना बदलापूर, नेरळ, अंबरनाथ, खोपोली आणि कर्जत येथील नागरिकांना कोणार्क एक्सप्रेसचा उपयोग होतो. परंतु, कोणार्क एक्सप्रेस पुण्यात रात्री उशिरा येते. त्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. यापूर्वी कर्जत स्टेशनवर गाडी थांबत होती. पण, येथील थांबा बंद केल्याने नागरिकांना कल्याण स्टेशनवर जावे लागते. कल्याण आणि कर्जतकडे जाणारी पहिला रेल्वे पहाटे साडेपाच वाजता आहे. नागरिकांना पहाटे तीन पासून रेल्वेची वाट पहात बसावे लागते.
दक्षिण भारतातून येणा-या चेन्नई, कोणार्क, कन्याकुमारी, महालक्ष्मी, सिंहगड, अहिंसा, कोल्हापूर, सह्याद्री, डेक्कन एक्सप्रेस अशा 18 रेल्वे गाड्यांनी कर्जत, चिंचवड स्थानकावरील थांबा बंद केला आहे. 1 डिसेंबरपासून सुरु झालेल्या इंटरसिटी एक्सप्रेसचाही कर्जत येथील थांबा बंद आहे. पूर्वी इंटरसिटी कर्जत स्थानकावर थांबत होती. पण, आता थांबा बंद केल्याने कर्जत, कल्याण मधील नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी आहे. चिंचवड, कर्जत स्थानकावर जास्तीत-जास्त गाड्यांना थांबा देण्याची नागरिकांची मागणी आहे. नागरिकांच्या सोईसाठी चिंचवड, कर्जत रेल्वे स्थानकावर पूर्वीप्रमाणे सर्व गाड्यांना थांबा देण्याची मागणी खासदार बारणे यांनी केली. तसेच पासची सुविधा पुन्हा सुरु करण्याची मागणी केली.
त्यावर रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी संबंधित अधिका-यांना बोलावून घेतले. लांब पल्ल्याच्या काही गाड्यांना चिंचवड, कर्जत स्थानकांवर थांबा देण्याचे आदेश दिले. तसेच पासची सुविधाही पुन्हा सुरु करण्याचे निर्देश दिल्याचे खासदार बारणे यांनी सांगितले. लांब पल्याच्या गाड्यांना थांबा मिळाल्याने नागरिकांची सोय होईल, असेही ते म्हणाले.