लोकमान्य टिळक यांनी जनमानसात देशभक्तीची भावना जागृत केली’
पिंपरी – लोकमान्य बाळ गंगाधर टिळक हे थोर समाजसुधारक, प्रखर देशभक्त आणि भारतीय स्वातंत्र्य चळवळीत आपल्या लेखणीद्वारे जनमानसात देशभक्तीची भावना जागृत करणारे आधारस्तंभ होते, असे प्रतिपादन महापौर उषा ढोरे यांनी केले.
लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या जयंतीनिमित्त महापालिकेच्या वतीने त्यांच्या निगडी चौक येथील पुतळ्यास महापौर ढोरे यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. त्यावेळी त्या बोलत होत्या.सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके, विरोधी पक्षनेते राजू मिसाळ, माजी महापौर संजोग वाघेरे, अ प्रभाग अध्यक्षा शर्मिला बाबर, नगरसदस्य अमित गावडे, नगरसदस्या शैलजा मोरे, अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप, कार्यकारी अभियंता रविंद्र पवार, जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक उपस्थित होते.
महापौर उषा ढोरे म्हणाल्या, इंग्रजांना स्वराज्य हा माझा जन्मसिध्द अधिकार आहे आणि तो मी मिळवणारचं असे निर्भिडपणे इंग्रजांना सांगणारे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांना असंतोषाचे जनक म्हणत असत. त्यांनी स्वातंत्र्यपूर्व काळात इंग्रजांच्या जुलमी वागणूकीबद्दल आपल्या वर्तमानपत्राच्या माध्यमातून सातत्याने वाचा फोडण्याचा प्रयत्न केला. जनमाणसात देशभक्ती जागृतीचे काम केले.
त्यांनी अनेक वेळा तुरुंगवास भोगला. शिक्षणाशिवाय देशाचा विकास, उन्नती होऊ शकत नाही याकरीता सर्वांनी शिक्षण घ्यावे यासाठी लोकमान्य टिळक आग्रही असायचे.