नायर रुग्णालय : रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर जमावाकडून तीन डॉक्टरांवर हल्ला!
मुंबई : मुंबईतील नायर रुग्णालयात एका रूग्णाचा मृत्यू झाला. जमलेल्या संतप्त नातेवाइकांनी तीन निवासी डॉक्टरांसह सुरक्षारक्षकावर हल्ला केला. या हल्ल्यात डॉक्टर सुरक्षारक्षक जखमी झाले. तसेच संतप्त नातेवाइकांनी रुग्णालयातील वस्तूंचीही तोडफोड केली. या प्रकरणी डॉक्टर आणि नायर रुग्णालय प्रशासनाने आग्रीपाडा पोलीस ठाण्यात एकमेकांविरोधात तक्रार दाखल केली.
या घटनेत डॉ. दीपाली पाटील, डॉ. गौरव गुंजन, डॉ. मॉइज व्होरा आणि सुरक्षारक्षक जखमी झाले. अधिक माहिती अशी की, रविवारी सायंकाळी राजकिशोर दीक्षित (31) याला वॉर्ड क्रमांक 23 मध्ये दाखल करण्यात आले. त्या वेळी त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे रुग्णाच्या कुटुंबीयांना सांगितले होते. रुग्णाने स्वत:च अन्ननलिकेजवळ लावलेल्या ट्यूब काढून टाकल्या. त्यामुळे प्रकृती गंभीर होऊन श्वसनास त्रास होऊन रुग्णाचा मृत्यू झाला.
डॉक्टरांनी रुग्णाला मृत घोषित केल्यानंतर संतप्त नातेवाइकांनी गोंधळ करीत डॉक्टर व सुरक्षारक्षकांना मारहाण केली. मात्र, रुग्णाच्या नातेवाईकांनी ट्यूब आम्ही काढले नाही. असे स्पष्टीकरण माध्यम प्रतिनिधींशी बोलताना दिले. रूग्णाचा शवविच्छेदन होत नाही,आणि उच्चस्तरीय चौकशी करत नाहीत, तो पर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही. असा इशारा दिला आहे.