#Lockdown:विश्वचषकाचा निर्णय 28 मे रोजी; खेळाडूंच्या क्वॉरंटाइनसह विनाप्रेक्षक आयोजनावर चर्चा
दुबई. आंतरराष्ट्रीय क्रिकेट काैन्सिलची (आयसीसी) २८ मे रोजी बैठक होणार आहे. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे होणाऱ्या बैठकीत ऑस्ट्रेलियामध्ये ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या टी-२० विश्वचषकाच्या आयोजनावर चर्चा होईल. कोरोना व्हायरसमुळे आयोजनावर अद्याप शंका आहे. जर विश्वचषक पुढे ढकलला तर त्याचे आयोजन २०२२ मध्ये होऊ शकते. कारण २०२१ मध्येदेखील टी-२० विश्वचषक होत असून त्याचे यजमानपद भारताला मिळाले आहे. एकूणच या स्पर्धेच्या आयाेजनाबाबत अनेक अडचणी निर्माण हाेणार आहेत. स्थगितीमुळे ही स्पर्धा दाेन वर्षांनंतरच आयाेजित केली जाणार असल्याचीही चर्चा आहे. आयसीसीच्या बैठकीत खेळाच्या नियमावरदेखील चर्चा हाेऊ शकते. यात चेंडूवर लाळ व घाम लावणे याचा समावेश असेल. यादरम्यान मंडळाच्या एका अधिकाऱ्याने म्हटले की, ‘क्रिकेट ऑस्ट्रेलिया विश्वचषक पुढे ढकलल्याने नाराज होणार नाही.
आयसीसीला आपल्या सर्व सदस्य देशाचे म्हणणे ऐकावे लागेल. जर कोणता देश द्विपक्षीय मालिकेला महत्त्व देत असेल तर त्याला कमी केले जाऊ शकत नाही.’ विश्वचषकानंतर डिसेंबर-जानेवारीत भारत ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार असून येथे संघ चार कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे.
ऑस्ट्रेलियाचे आजी-माजी खेळाडू कसोटी मालिका कोणत्याही परिस्थितीत खेळवण्याच्या बाजूने आहेत. मालिका न झाल्यास ऑस्ट्रेलियाचे मोठे नुकसान होऊ शकते. अधिकाऱ्याने म्हटले की, मालिका स्थगित केल्याने आयसीसीचे नुकसान होणार नाही, त्याच्या आयोजनाने सूट मिळू शकते. आयसीसीचे अध्यक्ष शशांक मनोहर यांचा कार्यकाळ दोन महिन्यांसाठी वाढवला जाऊ शकतो.
आयाेजनासाठीचे पर्याय
1. खेळाडूंना क्वाॅरंटाइन व्हावे लागेल, चाहत्यांसोबत आयोजन.
2. प्रेक्षकाविना विश्वचषकाचे आयोजन करण्यात यावे.
3. विश्वचषकाला २०२२ पर्यंत स्थगित करण्यात यावे.