#Lockdown:लाॅकडाऊनमध्ये 456 मजुरांचा अपघाती मृत्यू
मुंबई. आपल्या मूळ गावी परतु इच्छिणाऱ्या मजुर व प्रवाशांचे लाॅकडाऊन काळात विविध राज्यात तब्बल १ हजार २५३ अपघात झाले असून त्यामध्ये ४५६ मजुरांचा बळी गेल्याची माहिती ‘सेव्ह लाईफ फाऊंडेशन’ या रस्ते सुरक्षा क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या स्वयंसेवी संस्थेने जाहीर केली आहे.
कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी २५ मार्च पासून देशात लाॅकडाऊन लागू करण्यात आला. सध्या या लाॅकडाऊनचे चौथे चरण चालु आहे. या काळात रेल्वे व सार्वजनिक वाहतूक सेवा बंद आहे. त्यामुळे रोजगारासाठी परप्रांतात गेलेल्या मजुरांनी मिळेल त्या वाहनांनी किंवा पायी आपले मूळ गाव गाठण्याचा प्रयत्न केला.
या काळात १२५३ रस्ते अपघात झाले असून त्यात ४५६ बळी गेले तर ९३० लोक जखमी झाले आहेत. त्यामध्ये स्थलांतरीत बळींची संख्या १८० असून ६९४ जखमी आहेत. अत्यावश्यक सेवेतील ३० कर्मचारी मृत्यु पावले असून २६ जखमी आहेत. तर २४६ प्रवासी अपघाताचे बळी असून २१० जखमी आहेत. सर्वाधिक अपघात उत्तर प्रदेशात झाले आहेत. तेथे लाॅकडाऊन काळात १४४ मजूर व प्रवाशी अपघातात बळी गेले आहेत. मध्य प्रदेशात ४४, तेलंगणामध्ये ३७, महाराष्ट्रात २५ आणि पंजाब राज्यात २४ प्रवासी मजुरांचा अपघातात बळी गेला आहे.