#Lockdown:एपीएमसी मार्केट सोमवारपासून दोन टप्प्यात सुरु होणार
नवी मुंबई : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नवी मुंबईतील एपीएमसी मार्केट बंद करण्यात आले होते. सोमवारी 11 मे पासून बंद असलेलं एपीएमसीतील पाचही मार्केट सुरु करण्यासाठी कोकण आयुक्त आणि पाचही बाजारपेठांचे संचालक व्यापाऱ्यांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत येत्या सोमवारपासून एपीएमसी मार्केट सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
त्यानुसार आता थोडे दिवस पहिल्या टप्प्यात भाजी मार्केट, धान्य बाजार, मसाला बाजार सुरू होणार आहे. तर दुसऱ्या टप्प्यात फळ आणि कांदा बटाटा मार्केट चालू होणार आहे. यापूर्वी बाजारात सोशल डिस्टन्सिंग पाळत नसल्याने हे मार्केट बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
एपीएमसीतील बाजारात होणाऱ्या गर्दीमुळे वारंवार मार्केट बंद करण्यात आले होते. सध्या एपीएमसीमध्ये 370 व्यापारांना कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर आता मार्केटमध्ये विविध प्रकारच्या उपायोजनेनंतर मार्केट पुन्हा सुरू करण्यात येत आहे, अशी माहिती कोकण आयुक्त शिवाजी दौंड यांनी दिली.
- एपीएमसीच्या पाचही मार्केटमध्ये निर्जंतुकीकरण करण्यात आले.
- या मार्केटमधील 6 हजार घटकांची वैद्यकीय तपासणी होणार, संशयित रुग्णांना बाजारात प्रवेश नाही. त्यांना वैद्यकीय सहाय्य पुरवलं जाईल.
- गर्दी कमी करण्यासाठी जास्तीत जास्त व्यापार ऑनलाईन आणि टेलिफोन बुकिंगद्वारे करण्यासाठी प्रयत्न
- पाचही मार्केटमध्ये रोज येणाऱ्या वाहनांची आणि गाळ्यांची निर्जंतुकीकरण करणार
- वैद्यकीय तपासणीसाठी बाजाराच्या आवारातील प्रवेशद्वारावर स्वंतत्र वैद्यकीय पथक ठेवण्यात येईल.
- ज्या व्यक्तीकडे मास्क नसेल त्याला बाजार समितीतर्फे मास्क दिला जाईल.
- थर्मल गनद्वारे तपासणी आणि हातात सॅनिटायझर दिला जाईल.
- पल्स ऑक्सिमीटरद्वारे रक्तातील ऑक्सिजनची तपासणी होणार
- आवारात सॅनिटायझर स्टँड मोठ्या प्रमाणात उपलब्ध करण्यात येईल.
नवी मुंबईतील मार्केट सुरु केल्यानंतर यावर काही निर्बंध लावण्यात आले आहे. यानुसार आता बाजाराच्या आवारात 200 ते 250 गाड्यांचीच आवक होणार आहे. बाजार आवारात पूर्णपणे सोशल डिस्टनसिंगचे पालन न झाल्यास बाजार पुन्हा बंद करण्यात येईल, अशी ताकीदही देण्यात आली आहे.
मार्केटमध्ये शेतमाल घेऊन येणाऱ्या वाहनांना बाजार आवारात रात्री 9 ते सकाळी 5 वाजेपर्यंत प्रवेश देण्यात येईल. तर बाजार आवारात सकाळी 7 ते दुपारी 3 पर्यंत व्यापार करण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्याशिवाय संध्याकाळी 5 वाजेपर्यंत सर्व लोकल गाड्या बाजारातून बाहेर काढण्यात येणार आहेत. बाजार आवारात येणाऱ्या ग्राहकांसाठी 15 हजार रुपये किमतीची फळं खरेदी करणाऱ्या ग्राहकांनाच प्रवेश देण्यात येईल.