ताज्या घडामोडीलोकसंवाद - संपादकीय

यशाच्या उत्तुंग शिखरावरून, थेट आत्महत्येच्या खोल गर्तेत!

एका मनस्वी आणि चिंताजनक विषयाला आज हात घालू या.. प्रत्येक जण आपल्या जीवनात धडपडत असतो, पैशासाठी, प्रतिष्ठेसाठी, सुखासाठी.. समाधानासाठी ! आणि या सर्व गोष्टी पायाशी लोळण घेत असताना अशा व्यक्तींना अचानक आत्महत्या का करावीशी वाटते? याचे उत्तर मात्र सापडत नाही !

मन सुन्न करणारी यादी..

प्रचंड निराशा, विचार करण्याच्या क्षमतेचा अंत झाला की असे काहीतरी सुचत असावे.. मग कितीही मोठी व्यक्ती असो, ती यशाच्या उत्तुंग शिखरावरून थेट आत्महत्येच्या खोल गर्तेत पोहचते आणि समाजापुढे मोठे प्रश्नचिन्ह उभे राहते ! बरं, आत्महत्या कोणी करावी, का करावी? यालाही काही सीमा नाही..सहज आठवली, म्हणून मोठमोठी नावे पुढे आली.. आणि पुन्हा मन विचारांच्या पलीकडे जाऊन पोहोचले, अक्षरशः सुन्न झाले!

प्रचंड मोठे कर्तृत्व आणि आत्महत्या..

सोलापूरमध्ये दोन दिवसांपूर्वी अतिशय नावाजलेले, प्रतीथयश डॉ. शिरीष वळसंगकर यांनी डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली. सोलापुरातील अत्यंत लोकप्रिय, हजारो रुग्णांना रोगमुक्त आणि वेदनामुक्त करणारे डॉ. वळसंगकर यांचे जाणे मनाला फारच वेदना देऊन गेले आणि मन थोडेसे इतिहासात भरकटू लागले ! किती थोर मंडळींनी आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवून शेवटी आत्महत्येचा मार्ग पत्करला, हे पाहिले तर हे टोकाचे पाऊल उचलण्याएवढे काय झाले असावे, याचा विचार मनात येतो.

हिटलर, सानेगुरुजी, गुरुदत्त..

संकटाशी सामना करण्याची मानसिकता नसणारे भित्रे, भेकड, कमकुवत मनाचे लोक आत्महत्येचा मार्ग अवलंबत असावेत, असे संदर्भ अनेक पुस्तकांमध्ये मिळतात.. पण, अशा पद्धतीने जीवन संपवणाऱ्यांमध्ये अवघ्या जगाला हादरवणारा ॲडॉल्फ हिटलर, समतेची आणि मानवधर्माची ज्योत तेवत ठेवणारे सानेगुरुजी, एकापेक्षा एक सरस चित्रपट निर्मिती करणारे गुरुदत्त यांच्यासारख्यांचा समावेश असावा, ही बाब फारच चिंतनीय म्हणावी लागेल !

खरा तो एकची धर्म..

जगावर अधिराज्य गाजवणाऱ्या आणि आज सुद्धा एखाद्या कडक व्यक्तीचा उल्लेख ज्याच्या नावे केला जातो त्या लाखो जीव घेणार्‍या क्रूर हिटलरने शेवटी आत्महत्या केली ! समाजाला सुंदर विचार देणारे आणि सुंदर सुंदर लिखाण आणि काव्य करून समाज सुधारणेसाठी झटणारे सानेगुरुजी आत्मघात करुन घेतात. ‘खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे!’ असे म्हणत स्वतःला संपवून घेतात!

मनाला खंबीर करण्याचे शिक्षण..

‘मनशक्ती’ नावाचे मनाला खंबीर करण्याचे शिक्षण देणारे लोणावळ्याचे स्वामी विज्ञानानंद मंत्रालयावरुन उडी मारुन जीव देतात, ही धक्कादायक घटना नव्हे काय? अध्यात्मिक गुरु अशी ओळख निर्माण केलेले, लाखो शिष्यांचा लवाजमा भोवती असणारे आणि कित्येकांना आधार देणारे भैय्युजी महाराज आपले जीवन आपल्याच हाताने संपवतात आणि जीवनात सांभाळलेला लाखो जणांचा गोतावळा बेवारस सोडून निघून जातात, याचे आश्चर्य वाटते.

चित्रपट सृष्टीतील ‘गुरू’..

मुंबईत येऊन चित्रपटातील अभिनय, निर्मिती आणि दिग्दर्शन याचा एक आदर्श घालून देणारे गुरुदत्त हे अशाच पद्धतीने सर्व काही आलबेल वाटत असताना, आत्महत्या करून जगाचा निरोप घेतात आणि आपल्या चाहत्यांना दुःखाच्या खाईत लोटतात, हे अनाकलनीय वाटते ! पॉझिटिव्ह विचार देणारा चित्रपट करुनही सुशांतसिंग राजपूतने नैराश्यातून आत्महत्या केली, असे म्हटले जाते पण खरे कारण अजून समजलेले नाही !

नैराश्याबरोबर दोन हात करत..

काही महिन्यांपूर्वी नैराश्याशी लढा कसा द्यायचा, याचे धडे जनतेला देणाऱ्या, त्याची शिकवण आणि आनंदाची उधळण करणाऱ्या एका तेजस्वी घराण्यातील शीतल (आमटे) करजगी आपले जीवन असेच अचानक संपवतात आणि पुन्हा आनंदा पुढे मोठे प्रश्नचिन्ह उभे करतात!

नागपूरची डोके सुन्न करणारी बातमी..

नागपूरची बातमी वाचून तर डोके सुन्नच झाले. उच्च विद्याविभूषित, दिवंगत कुलगुरुंच्या पत्नी तसेच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या रसायनशास्त्र विभाग प्रमुख डॉ. ज्योत्स्ना मेश्राम यांनी नवव्या मजल्यावरून उडी घेऊन नैराश्यातून आत्महत्या केली. कदाचित कारण काहीतरी वेगळे असेल, पण आत्महत्या करण्याचे सुचले कसे ? याचा विचार करताना डोके चालत नाही, हे नक्की!

एक ना दोन.. शेकडो उदाहरणे !

अशी एक ना दोन शेकडो उदाहरणे आपण रोज समाजात पाहतो. मोठे नाव असेल तर वृत्तपत्रांमध्ये बातमी येते, खेडोपाडी अनेक जीव असेच गेलेले असतात, ज्यांचा मागमूसही लागत नाही. परीक्षेत कमी मार्क पडतील या भीतीने, कमी मार्क पडले..आता आई-बाबा काय म्हणतील? या अपेक्षेने अनेक जण मृत्यूला कवटाळतात..मानसिक, शारीरिक छळ, कुटुंबाची चिंता, वाढलेले कर्ज, शुल्लक कारणावरून होणारे वाद..अशा अनेक घटना आत्महत्येला कारणीभूत असाव्यात !

हेही वाचा –  PCMC: पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या नव्या संकेतस्थळाचे लोकार्पण

समाजाने काय शिकायचे?

जगातील थोरामोठ्यांची अशी दुर्दैवी उदाहरणे पाहून सर्वसामान्यांनी त्यातून काय शिकायचे? हा खरा प्रश्न आहे. पाण्यात शांतपणे पोहणारे बदक वरुन शांत दिसत असले तरी पाण्याखाली त्याचे पाय वेगाने हलत असतात. शांत पोहतोय, हे दाखवण्यासाठी करावे लागणारे त्याचे कष्ट फक्त त्यालाच माहीत असतात. माणूस वर वर दिसतो तितका आतून खंबीर असेलच असे नाही..त्याच्या मनात वेगळीच खळबळ असू शकते..मनात वेगळीच विचारचक्रे फिरत असू शकतात, जी आपल्यापर्यंत पोहचत नाहीत किंवा तो त्या आनंदी आणि सुखी चेहर्‍याच्या आड आपली दुःखे किंवा चिंता लपवत असतो, लपवण्याचा प्रयत्न करत असतो!

शेवटी काय? वर सुंदर दिसणारा ताजमहाल असला तरी खाली कबरच आहे, हे विसरुन चालणार नाही. भैय्यूजी महाराजांनी आत्महत्या केल्यानंतर एका चॅनलने एक परिचर्चा घडवून आणली होती. त्यात बोलताना भैय्यूजी महाराजांच्या अगदी जवळच्या मित्राने मानवी स्वभावाचा फार चांगला पैलू सांगितल्याचे आठवते. भैय्यूजी महाराज स्वतः एक अध्यात्मिक गुरू होते, परंतु ते एक व्यक्ती पण होते. आपल्या मनातील ‘स्ट्रेस’ म्हणजेच तणाव बाहेर काढायला, मनमोकळेपणाने बोलायला त्यांच्याजवळ अगदी आपलीशी जवळ वाटणारी व्यक्ती किंवा सानिध्य ( थोडक्यात आऊटलेट ) नव्हते ! हीच गोष्ट बाबा आमटे यांची नात डॉ. शीतल आमटे यांच्या बाबतीतही सांगता येईल.

व्यक्त व्हा..महत्वाचे आहे ते !

कोट्यवधी रूपये खर्च करून पाण्यासाठी विशाल धरण बांधले आणि समजा त्याला बाहेर पडण्याचा मार्ग (आऊटलेट) च दिला नाही, तर काय होईल ? निश्चितच धरण फुटेल. इतके महत्वाचे असते, हे मनसोक्तपणे व्यक्त होणे! आपले मानवी शरीर म्हणजे विविध पंचतत्वापासून सांधलेले एक धरणच आहे. या शरीरात समस्यांची आवक मोठ्या प्रमाणात झाली, तर हे शरीररूपी धरण फुटेल का तंदुरुस्त राहील ? मुंबई दरवर्षी का तुंबते ? पुरेसे ‘आउटलेट्स’ नाहीत म्हणूनच ना !

मित्र वाढवा, माणसे जपा..!

म्हणून आता एकच सांगणे आहे, की आपले ‘आउटलेटस्’ सदैव सताड उघडे ठेवा. आपल्या तोंडाचे ‘आउटलेट’ वापरून आपल्या समस्या ‘आपल्या’ माणसांना सांगा. आपले डोळे उघडा. फुटून जाऊ द्या,अश्रूंचा बांध! ताण, तणाव, दुःख, अपेक्षा यावर मार्ग निघू शकतो. पिस्तुलाच्या गोळीने डोक्याला छिद्र पाडण्यापेक्षा, पंख्याला लटकण्यापेक्षा, विष पिण्यापेक्षा हे केव्हाही सोपं नाही का? आता शेवटचा सल्ला, म्हणूनच मित्र नावाच्या खांद्याचा आधार घ्या. मन मोकळं करा. ‘बेस्ट आउटलेट’ परिवार आणि मित्र!
हसा ! बोला ! रडा ! भांडा !
व्यक्त व्हा !! मुक्त व्हा!! आपुलकीची माणसं मिळायला खूप मोठं भाग्य लागतं..अशी सोन्यासारखी माणसं मिळवा..त्यांना जपा..आणि मुख्य म्हणजे आपल्या दुःखावर नकळत फुंकर मारणारा एखादा छंद जोपासा ! ‘मिस यू’ म्हणण्यापेक्षा ‘वुईथ यू’ म्हणा !

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button