सोलापूरच्या अधिकाऱ्यांनी वारीत उमटवली छाप!
लाखोंच्या गर्दीत कोणताही गोंधळ नाही, सुरळीत व व्यवस्थित नियोजनाच्या बळावर वारी पार
सोलापूर : यंदाची आषाढी वारी केवळ भक्तीभावानेच नव्हे, तर प्रशासनाच्या संवेदनशील आणि अभ्यासपूर्ण नियोजनामुळेही एका वेगळ्याच पातळीवर पोहोचली. लाखोंच्या गर्दीत कोणताही गोंधळ न होता, सुरळीत व व्यवस्थित नियोजनाच्या बळावर ही वारी पार पडली.
याचे संपूर्ण श्रेय जाते जिल्हा प्रशासनाला. विशेषतः जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम आणि पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी हे तिघेही ‘हिंदी भाषिक अधिकारी, पण अस्सल मराठीतून संवाद’ साधत त्यांनी वारी व्यवस्थापनात अचूक समन्वय साधून आपली एक खास ओळख निर्माण केली आहे.
जरी हे अधिकारी इतर राज्यातील असले तरी त्यांनी आपल्या कृतीतून आणि भाषेतून ‘मनाने मराठी’ असल्याचे सिद्ध केले. हिंदी भाषिक असूनही, त्यांनी वारकऱ्यांशी अस्सल मराठीत संवाद साधत अडचणी जाणून घेतल्या, त्यामुळे भाविकांमध्ये एक वेगळीच आपुलकी निर्माण झाली. विशेष म्हणजे, सध्या राज्यभरात हिंदी सक्तीवरून वाद पेटलेले असताना, या अधिकाऱ्यांनी आपल्या भाषिक समजुतीचा आदर्श ठेवला.
हेही वाचा – “पिकलेल्या दाढीचे केस रंगवण्याची वेळ…”; विराटने सांगितले कसोटी निवृत्तीचे कारण
या वर्षीच्या वारीत २५ ते २८ लाखांहून अधिक वारकरी सहभागी झाले, तरीही कुठेही वाहतुकीचा खोळंबा, अन्न-पाण्याची कमतरता किंवा आरोग्यविषयक अडचण निर्माण झाली नाही. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी समन्वयक अधिकारी म्हणून विविध यंत्रणांमध्ये ताळमेळ साधून वारी सुरळीत पार पाडली.
पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली कडक सुरक्षा व्यवस्था राबवण्यात आली, तर मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांच्या मार्गदर्शनाखाली शासकीय यंत्रणा युद्धपातळीवर कार्यरत होती. प्रत्येक मुक्कामी पोलिस बंदोबस्त, वाहतूक नियमन, स्वच्छता, वैद्यकीय मदत, पिण्याचे पाणी आणि माहिती केंद्र यांची अचूक मांडणी केली गेली होती.
या तिन्ही प्रमुख अधिकाऱ्यांनी स्वतः वारकऱ्यांमध्ये जाऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. जिल्हाधिकारी आणि सीईओ यांनी वारकरी संप्रदायाचा पारंपरिक पोशाख परिधान करून पालखी सोबत चालत सहभाग नोंदवला, तर पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी वारकऱ्यांचा फेटा बांधून वारीत प्रत्यक्ष सहभाग घेतला. या तिन्ही अधिकाऱ्यांनी दाखवलेली तत्परता, लोकाभिमुखता आणि भाषिक समजूतदारपणा म्हणजे आजच्या प्रशासकीय व्यवस्थेचे एक सुंदर उदाहरण आहे.
महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा
“माझी जन्मभूमी जरी इतरत्र असली, तरी ही माझी कर्मभूमी महाराष्ट्र आहे. माझ्या मुलीचा जन्म महाराष्ट्रात झालेला आहे. पंढरपूर हे देशातील सर्वाचे श्रध्दास्थान असून, पंढरपूरच्या पावन भूमीत काम करण्याचा भाग्य लाभले असून, वारीत मराठीतुन वारकऱ्यांशी संवाद साधल्याने, अडिअडचणी सोडविण्यास मदत झाली. सर्वांच्या सहकार्याने यंदाची वारी निर्विघ्नपणे यशस्वी झाली.
– कुमार आशीर्वाद, जिल्हाधिकारी सोलापूर.
योग्य व्यवस्थापन, स्वच्छता अभियान, आरोग्य सेवा याकडे बारकाईने लक्ष ठेवून वारकऱ्यांची गैरसोय होऊ नये याची काळजी घेतली. वारीच्या प्रत्येक टप्प्यावर नियोजनानुसार निर्णयांची अंमलबजावणी केली. लाखो लोकांचा समन्वय म्हणजे एका कुटुंबाचे नियोजन. आम्ही ती जबाबदारी मनापासून पार पाडली.
– कुलदीप जंगम, मुख्य कार्यकारी अधिकारी सोलापूर जिल्हा परिषद.





