काऊंटडाऊन झाले सुरू, हवाई दल, नौदल सज्ज !
भारताची यशस्वी क्षेपणास्त्र चाचणी : युद्धनौका पाकच्या समुद्र सीमेवर धडकली !

श्रीनगर : पाकिस्तानवर कारवाई करून त्यांचे कंबरडे मोडण्यासाठी ‘ काऊंटडाऊन सुरू झाले आहे. भारताने युद्धसराव सुरू केला असून पाकिस्तानमध्ये प्रचंड तणावाची परिस्थिती आहे. कोणत्याही क्षणी भारताकडून हल्ला होण्याची शक्यता असल्याचे पाकिस्तानच्या नेत्यांनी नागरिकांना सांगितले आहे.
‘आयएनएस विक्रांत’ सज्ज, क्षेपणास्त्र चाचणी
भारताची ‘आयएनएस विक्रांत’ ही युद्धनौका संपूर्ण यंत्रसामग्रीनिशी आणि अत्याधुनिक लढाऊ विमानांसह समुद्रात पाकिस्तानच्या सीमेजवळ जाऊन धडकली आहे. या पार्श्वभूमीवर ‘आयएनएस सुरत’ वरून भारताने क्षेपणास्त्र चाचणी घेतली असून ती यशस्वी झाली आहे. हा पाकिस्तानला फार मोठा इशारा आहे.
पाकिस्तान प्रचंड तणावात..
पाकिस्तानमध्ये उच्चस्तरीय बैठकांचा मोठा सिलसिला झाला. भारताकडून कोणत्याही क्षणी हल्ला होण्याची शक्यता तेथील नेत्यांनी व्यक्त केली आहे. भारताने सागरी मार्गाने, हवाई मार्गाने किंवा जमिनीवरून काही आगळीक केली तर कराची, रावळपिंडी आणि इस्लामाबाद येथे सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत. भारताच्या विरोधात पाकिस्तानने देखील काही मोठी पावले उचलल्याचे सांगितले जाते.
भारतातील विरोधक मोदींच्या पाठीशी..
दरम्यान, संरक्षण मंत्री राजनाथसिंह यांच्या नेतृत्वाखाली सर्व विरोधी पक्षांची बैठक झाली आणि त्यात विरोधकांना सत्ताधाऱ्यांनी पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर उद्भवलेली परिस्थिती तसेच आपली आगामी रणनीती सांगितली. मोदी सरकारने कोणतीही पावले उचलली तरी आम्ही त्यांच्या पाठीशी ठाम आहोत, असा निर्धार सर्व विरोधी पक्षांच्या वतीने काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी स्पष्ट केला.
लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी श्रीनगरमध्ये..
या महत्त्वपूर्ण बैठकीला गृहमंत्री अमित शाह, परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर, काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, नेते राहुल गांधी यांच्यासह अनेक विरोधी पक्षनेते उपस्थित होते. बैठकीत ठरल्याप्रमाणे लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी श्रीनगरच्या दिशेने रवाना झाले आहेत.
युद्ध तयारीमुळे पाकिस्तानात अस्वस्थता..
भारताने घेतलेली क्षेपणास्त्र चाचणी हा संपूर्ण जगात चर्चेचा विषय ठरला आणि पाकिस्तानमध्ये मोठी अस्वस्थता पसरली. जमिनीवरून जमिनीवर आणि समुद्रातून जमिनीवर मारा करणारे हे क्षेपणास्त्र भारताची भक्कम बाजू आहे, असे सांगण्यात आले. तत्पूर्वी भारताच्या प्रत्युत्तराच्या भीतीने पाकिस्तानने दि. २४ आणि २५ एप्रिल रोजी कराची बंदराच्या किनाऱ्यावरील त्यांच्या विशेष आर्थिक क्षेत्रात क्षेपणास्त्रविरोधी यंत्रणा सज्ज ठेवण्याचे आदेश दिले आहेत. त्याचप्रमाणे, गेले दोन दिवस पाकिस्तानच्या हवाईदलाने अतिशय दहशतीमध्ये घालवले आहेत.
हेही वाचा : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते राज्य कुटुंब कल्याण भवन व प्रशिक्षण केंद्र इमारत भूमिपूजन
नरेंद्र मोदी यांचे इशारे धडकी भरवणारे..
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बिहारमध्ये विकासकामांच्या भूमिपूजनासाठी पोहचले होते. तेथे संपूर्ण भाषणात त्यांनी पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यावर भाष्य केले. शेवटचा दहशतवादी जिवंत असेपर्यंत माझे सरकार गप्प बसणार नाही. या दहशतवाद्यांना आणि त्यांना पाठिंबा देणाऱ्यांना त्यांच्या अपेक्षेपेक्षा जास्त मोठी शिक्षा मिळणार आहे. त्यांना नेस्तनाबूत केल्याशिवाय भारत सरकार आता स्वस्थ बसणार नाही, असे मोदी म्हणाले.
काहीजणांना भिकेचे डोहाळे..
आनंदाने राहण्याचे सोडून काही नेत्यांना आणि राष्ट्रांना भिकेचे डोहाळे लागले आहेत, असे नमूद करून मोदी म्हणाले की अशांचा बंदोबस्त निश्चित केला जाईल. पाकिस्तानला तर चारही बाजूंनी कोंडीत पकडण्यासाठी कालच पाच प्रहार करण्यात आले आहेत. अनेक वेळा इशारी देऊनही त्यांची खुमखुमी संपत नसेल, तर कठोरातील कठोर कारवाई करण्याशिवाय आमच्या पुढे गत्यंतर नाही, तेही त्यांनी ठणकावून सांगितले.
आता भारत मोठ्या कारवाईच्या तयारीत..
देशविदेशातील प्रतिक्रियांबाबत कानोसा घेतला तर रशियातील माध्यमानी म्हटले आहे, की भारताला डिवचणे पाकिस्तानला फार महागात पडणार आहे. भारताची मानसिकता आणि सध्याची परिस्थिती पाहता भारत काहीतरी मोठी कारवाई करणार हे निश्चित आहे. भारत सरकारने अटारी सीमा बंद करण्याची घोषणा केल्यानंतर व्हिसावर भारतात आलेले पाकिस्तानी नागरिक अटारी चेक पोस्टवर गर्दी करून बसले आहेत. पाकिस्तानमध्ये परतण्यासाठी अशा नागरिकांच्या रांगा लागल्या आहेत. भारत सरकारने पाकिस्तान सरकारच्या ‘एक्स’ हँडलवर भारतात बंदी घातली आहे. त्यांच्या सोशल मीडियावरील काही साइट्स ब्लॉक करण्यात आल्या आहेत. अनेक देशांच्या सरकारांनी त्यांच्या नागरिकांना अधिकृत सूचना देऊन जम्मू-काश्मीरला न जाण्याबाबत आदेश दिले आहेत. शक्य असेल तर आपल्या देशात परत यावे, असे आवाहन केले आहे. या सर्व पार्श्वभूमीवर काश्मीरमध्ये काळे झेंडे दाखवून नागरिकांनी दुकाने बंद ठेवली. तर पाकव्याप्त काश्मीरमध्ये ‘पाकिस्तान मुर्दाबाद..हिंदुस्तान झिंदाबाद..मोदी मोदी’ असे नारे घुमले.