भारताकडून कूटनीतीचा खेळ, पाकवर भीक मागण्याची वेळ!
पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांनी पहलगाममध्ये केलेल्या हत्याकांडानंतर भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ चे पाऊल उचलले आणि उट्टे काढले. त्या कारवाई मध्ये पाकिस्तानची पूर्णपणे जिरवली आणि आपल्याला पाहिजे तसे डाव भारताने टाकले.
सिंधू नदीचे पाणी अडवले..
केवळ बावीस तासांमध्ये भारताने पाकव्याप्त काश्मीर तसेच पाकिस्तानात घुसून दहशतवाद्यांचे नऊ अड्डे उद्ध्वस्त तर केलेच, पण दीडशेपेक्षा जास्त दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. त्यानंतर युद्धविराम झाला खरा, पण सर्वात प्रमुख अट भारताने जी घातली ती म्हणजेl पाकिस्तानने काहीही आगळीक केली तरी त्यांच्यावर कारवाई करण्याचा एक हातचा भारताने राखून ठेवला. त्यानंतर मात्र पुलाखालून बरेच पाणी गेले आहे. काश्मीर मधून पाकिस्तान मध्ये वाहत नद्यांचे पाणी अडविण्याचा निर्णय भारताने घेतला आणि पाकिस्तानच्या तोंडचे पाणी पळाले !
भारताचे चहुबाजूनी निर्बंध..
भारत सरकार एवढ्यावर थांबले नाही तर पाकिस्तानची चारही बाजूंनी कोंडी करण्याची एकही संधी भारताने सोडली नाही. मग तो व्यापार असो, भारतीय वस्तूंची निर्यात असो किंवा पाकिस्तानातून होणारी आयात असो. निर्बंध आणून या सर्व गोष्टींवर पाकिस्तानला अडचणीत आणायचे याचा चंग भारताने बांधला आणि कृती देखील केली.
दहशतवादी बुरखा फाडला..
भारत एवढ्यावर थांबला नाही तर भारताची अनेक प्रतिनिधी मंडळे परदेशात जाऊन त्यांनी पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडण्याचे काम केले. दहशतवादाविरुद्ध भारताने घेतलेली भूमिका कशी योग्य आहे, हे पटवून देताना भारताने अनेक देशांना आपल्या बाजूने वळवून घेतले. या मुद्द्यावर सर्व आघाड्यांवर पाकिस्तान वर गल्लीतगात्र होण्याची वेळ आली आणि आता तर कोणत्याही दहशतवादी हालचाली त्यांनी केल्या तर त्याचा वचपा भारत काढणार, हे देखील त्यांना पुरेपूर माहित आहे.
पाकिस्तान पुरता घायाळ..
या सर्व पार्श्वभूमीवर भारताने आता जे वार केले आहेत, त्यामुळे पाकिस्तान पुरता घायाळ झाला आहे. भारताची कूटनीती ही त्यांच्या समजण्यापलीकडे गेली असल्यामुळे पाकिस्तानचे सरकार, त्यांचे लष्कर आणि तेथील नेते हैराण होऊन डोक्याला हात लावून बसले आहेत. त्यांना जागतिक स्तरावर अक्षरशः हैराण करण्यात आले असून पाकिस्तानवर भीकेकंगाल होण्याची वेळ आली आहे.
हेही वाचा – Masterstroke : आमदार महेश लांडगे यांच्या मागणीनंतर ‘अनलॉग हिंजवडी’बाबत तातडीने बैठक!
भारत-पाक संबंध ताणलेलेच..
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध अजूनही ताणलेलेच आहेत. भारताने पाकिस्तानवर अनेक प्रकारचे निर्बंध लादले आहेत. यामुळे पाकिस्तानच्या खिशाला चांगलीच झळ बसत आहे, हे स्पष्ट दिसत आहे. भारताचा असा वार झाला आहे की ज्यात पाकिस्तान पुरता घायाळ होऊन निपचित पडला आहे. जम्मू – काश्मीरमधील पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध कमालीचे ताणलेले आहेत. ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून भारताने पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर दिले आहे. दरम्यान, सध्या या दोन्ही देशांनी एकमेकांवरील थेट हल्ले थांबवले आहेत, हीच फक्त समाधानाची बाब आहे. मात्र, पहलगाम हल्ल्यानंतर भारताने घेतलेल्या निर्णयामुळे पाकिस्तानला ज्या जखमा झालेल्या आहेत, त्या अजूनही भळभळत आहेत.पाकिस्तानला मोठा फटका बसत आहे. भडभळणाऱ्या या जखमांवर कोणते मलम लावावे, म्हणजे भारताची आक्रमकता कमी येईल, या विचारात पाकिस्तानचे नेते आहेत.
पाकिस्तानला व्यापारात फटका..
पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तासोबतच्या व्यापारावर अनेक प्रकारचे निर्बंध आणले आहेत. भारताने पाकिस्तानी मालवाहू जहाजांना भारतीय बंदरांवर प्रवेश निषिद्ध केला आहे. पाकिस्तानहून येणारे तसेच पाकिस्तानी माल वाहून नेणारे कोणत्याही जहाजास भारताच्या बंदरावर येण्यास मज्जाव करण्यात आला आहे. परिणामी भारताच्या या निर्णयाचा पाकिस्तानला चांगलाच फटका बसत आहे. भारतामुळे पाकिस्तानी माल वाहून नेण्यासाठीची शिपिंग कॉस्ट वाढली आहे. त्याशिवाय, माल वाहतूक करण्यास आणि इप्सित स्थळी वस्तू पोहोचवण्यास उशीर होत आहे.
वाहतूक खर्चातही वाढ..
पाकिस्तानमध्ये प्रसिद्ध असलेल्या ‘डॉन’ या वृत्तपत्राने याबाबत वृत्त दिले आहे. भारताच्या भूमिकेबद्दल या वृत्तपत्राने मोठी चिंता व्यक्त केली असून भारताची ही भूमिका पाकिस्तानला परवडणारी नाही, असे म्हटले आहे. भारताने घातलेल्या निर्बंधांमुळे वाहतुकीसाठी लागणारा वेळ वाढला आहे. तसेच वाहतुकीच्या खर्चातही वाढ झालेली आहे, असे या वृत्तात म्हणण्यात आले आहे. ‘कराची चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री’ चे अध्यक्ष जावेद बिलवानी यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. भारताच्या कारवाईमुळे मालवाहतूक करणारी महत्त्वाची जहाजे पाकिस्तानला येत नाहीत. त्यामुळे मालवाहतुकीसाठी साधारण ३० ते ५० दिवसांचा उशीर होत आहे. त्यामुळे जहाजामधील साहित्याचा विध्वंस होणे, नाशवंत मल खराब होणे आणि माल वेळेवर न पोहचल्यामुळे सर्वच प्रकारच्या संकटांना तोंड देण्याची वेळ पाकिस्तानवर आली आहे.
‘शिंपिंग कॉस्ट’वाढली..
पाकिस्तानमध्ये होणाऱ्या आयातीसाठी आता फिडर जहाजांवर अवलंबून राहावे लागत आहेत. त्यामुळे वाहतुकीच्या खर्चात वाढ झाली आहे, असेही बिलवानी यांनी सांगितले आहे. भारताने घातलेल्या निर्बंधांमुळे शिंपिंग कॉस्ट तसेच विम्याची रक्कमही वाढवण्यात आलेली आहे. असे असले तरी एकूण निर्यातीवरील प्रभाव नगण्य आहे, असा दावा त्यांनी केला आहे. या सर्व संकटांवर मात करण्याचा प्रयत्न पाकिस्तानकडून होत आहे, परंतु भारताने आखलेल्या कूटनीतीचा मोठा फटका मात्र पाकिस्तानला बसत आहे.
पाकिस्तान विनंती करणार ?
दरम्यान, आता पाकिस्तानच्या खिशाला बसत असलेली ही झळ पाहता, तेथील सरकार भारताला आयात-निर्यातीवरील निर्बंध हटवण्याची विनंती करणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. भारताच्या सर्व प्रकारच्या कूटनीतीमध्ये भारताचे पारडे नेहमीच सकारात्मक बाजूकडे आहे, तर फटका मात्र पाकिस्तानला बसत आहे. तथापि, पाकिस्तान सरकार कोठेही नमती बाजू घेण्यास तयार नसल्यामुळे भारतालाही आपली आग्रही भूमिका कायम ठेवावी लागत आहे आणि त्या माध्यमातून पाकिस्तानला जेरीस आणणे सोपे जात आहे, हे मात्र नक्की !





