अमृतसरहून बिहारला जाणाऱ्या गरीबरथ एक्सप्रेसला आग; तीन डबे जळून खाक

Garib Rath Express | पंजाबमधील अमृतसरहून बिहारमधील सहरसाकडे जाणाऱ्या गरीबरथ एक्सप्रेसला शनिवारी (१८ ऑक्टोबर) पहाटे मोठा अपघात झाला. धावत्या ट्रेनला अचानक आग लागून तीन डबे जळून खाक झाले. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही, अशी माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे.
ही घटना पंजाबमधील सरहिंद रेल्वेस्थानकाजवळ, अंबाला स्टेशनच्या सुमारे एक किलोमीटर अंतरावर घडली. पहाटे ट्रेनच्या एका डब्यातून धूर निघताना दिसल्याने तातडीने ट्रेन थांबवण्यात आली. काही क्षणांतच आग पसरत तीन डब्यांनी पेट घेतला. मात्र, चालक दल आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या तत्परतेमुळे मोठी हानी टळली. प्रवाशांनी घाईघाईने ट्रेनमधून बाहेर पडून जीव वाचवला.
हेही वाचा : शेतकऱ्यांना दिलासा, आज खात्यात जमा होणार अतिवृष्टी नुकसान भरपाई
सरहिंद जीआरपी एसएचओ रतन लाल यांनी या घटनेची माहिती देताना सांगितलं की ट्रेनच्या एका डब्यातून धुराचे लोळ बाहेर पडत असल्याचं पाहिलं. त्यानंतर ताबडतोब ट्रेन थांबवण्यात आली. त्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही. ट्रेन थांबताच प्रवासी लगबगीने ट्रेनमधून उतरले. या आगीमुळे ट्रेनचे तीन डबे जळून खाक झाले आहेत. मात्र, आगीचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. आम्ही आग लागण्यामागचं कारण शोधण्याचा प्रयत्न करत आहोत. लवकरच यासंबंधीचं निवेदन जारी केलं जाईल. त्याद्वारे आगीचं कारणही स्पष्ट केलं जाईल.
या घटनेची माहिती देताना रेल्वे मंत्रालयाने म्हटलं आहे की पंजाबमधील सरहिंद स्टेशनजवळ आज सकाळी १२२०४ अमृतसह सहरसा गरीब रथ एक्सप्रेसच्या एका डब्याला आग लागली. या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. आग विझवण्यात आली आहे.
दरम्यान, स्थानिक प्रसारमाध्यमांच्या माहितीनुसार, या घटनेत एक महिला किरकोळ जखमी झाली असून तिला जवळच्या सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तिची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे.




