#CoronaVirus | 21 दिवसांचा लॉकडाऊन वाढण्याच्या चर्चा, अखेर केंद्र सरकारकडून स्पष्टीकरण

नवी दिल्ली |‘कोरोना’चा प्रसार रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 21 दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा केली आहे. लॉकडाऊनचा कालावधी आणखी वाढण्याच्या चर्चा रंगलेल्या असताना केंद्राने मात्र ही शक्यता धुडकावून लावली आहे. ‘लॉकडाऊन वाढवण्याचा केंद्र सरकारचा कोणताही विचार नाही. असे अहवाल वाचून मला आश्चर्य वाटले’ अशी प्रतिक्रिया कॅबिनेट सचिव राजीव गौबा यांनी एका वृत्तसंस्थेला दिली.
भारतात रविवार संध्याकाळपर्यंत कोरोना व्हायरसचे एक हजारांपेक्षा अधिक रुग्ण आढळल्याची सरकारी आकडेवारी आहे. भारतातील एकूण कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 1071 पर्यंत वाढली आहे. यापैकी 942 रुग्णांवर उपचार सुरु असून 99 जण बरे झाले आहेत. तर 29 जणांचा मृत्यू झाला आहे. आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने ही माहिती दिली. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने (आयसीएमआर) रविवारपर्यंत 34 हजार 931 रुग्णांच्या कोरोना चाचण्या घेतल्याचं सांगितलं.





