#CoronaVirus: गंभीर आजार असल्यास, श्रमिक रेल्वेचा वापर नको!

स्थलांतरित मजुरांना आपापल्या राज्यांमध्ये घेऊन जाणाऱ्या श्रमिक रेल्वेंमध्ये प्रवाशांच्या मृत्यूनंतर, शुक्रवारी रेल्वे मंत्रालयाने नवी सूचना जाहीर केली. गंभीर आजार असलेल्या लोकांनी श्रमिक रेल्वेंमधून प्रवास करणे टाळावे, असे रेल्वे मंत्रालयाने काढलेल्या निवेदनात म्हटले आहे.
श्रमिक रेल्वेतून प्रवास करणाऱ्या नऊ प्रवाशांचा मृत्यू झाल्यानंतर या प्रकरणाची रेल्वे मंत्रालयाला दखल घ्यावी लागली. मात्र हे मृत्यू गंभीर आजारांमुळे झाल्याचा दावा रेल्वेने केला आहे. आधीपासूनच आजारी असलेल्या व्यक्ती श्रमिक रेल्वेंमधून प्रवास करत असल्याचे आढळले आहे. करोनाच्या महासाथीमुळे त्यांच्या प्रकृतीला आणखी धोका होण्याची शक्यता आहे.
उच्च रक्तदाब, मधुमेह, हृदयरोग, कर्करोग आदी गंभीर आजार असलेल्या व्यक्ती, गर्भवती महिला, १० वर्षांपेक्षा कमी वयाची बालके, ६५ वर्षांपेक्षा जास्त वयोवृद्ध यांनी श्रमिक रेल्वेंतून प्रवास करणे अत्यंत आवश्यक असेल तरच करावा, असे रेल्वेच्या निवेदनात म्हटले आहे. हीच सूचना रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी ट्वीटद्वारेही शुक्रवारी दिली. रेल्वे आपल्या प्रत्येक प्रवाशाच्या सुरक्षेसाठी कटिबद्ध आहे. जनतेकडूनही सहकार्याची अपेक्षा आहे, असेही गोयल यांनी म्हटेल आहे.





