केंद्र सरकारचा मोठा निर्णय! २० किमीपर्यंत टोल मुक्त, GNSS प्रणाली लागू

New Toll Rules | केंद्र सरकारने टोल टॅक्ससंदर्भात एक मोठा निर्णय घेतला आहे, ज्याचा फायदा देशभरातील वाहनधारकांना होणार आहे. केंद्रीय रस्ते आणि परिवहन मंत्रालयाने नवीन नियमावली जाहीर केली आहे, ज्यामध्ये २० किलोमीटरपर्यंत रस्ते वापरणाऱ्यांना टोल टॅक्स लागू होणार नाही. या सूटचा लाभ घेण्यासाठी वाहनावर ग्लोबल नेव्हिगेशन सॅटेलाइट सिस्टम (GNSS) बसवलेली असणे आवश्यक आहे. ही सुविधा विशेषत: टोल प्लाझाच्या जवळ राहणाऱ्या आणि कमी अंतरावर प्रवास करणाऱ्या वाहनधारकांसाठी महत्त्वाची ठरणार आहे.
रस्ते परिवहन मंत्रालयाने जाहीर केलेल्या अधिसूचनेनुसार, राज्य महामार्ग आणि राष्ट्रीय महामार्गावर २० किमीपर्यंत प्रवास करणाऱ्यांना टोलमधून सूट दिली जाईल. या अंतरावर वाहतूक करणाऱ्यांना आता टोल न भरता प्रवास करता येईल. मात्र, २० किमी पेक्षा जास्त अंतरावर रस्ता वापरणाऱ्यांना त्यानुसार टोल आकारला जाईल. हा निर्णय प्रवाश्यांच्या दृष्टीने फायदेशीर ठरणार आहे, कारण कमी अंतरावर प्रवास करणाऱ्यांना टोल टॅक्स कमी होईल किंवा पूर्णपणे वगळला जाईल.
हेही वाचा – वयाच्या १०४ व्या वर्षी गृहमतदान करून ‘त्यांनी’ लोकशाहीच्या उत्सवात नोंदवला सहभाग
ग्लोबल नेव्हिगेशन सॅटेलाइट सिस्टम (GNSS) तंत्रज्ञानाचा वापर देशभरातील टोल प्लाझावर होणार आहे. हा तंत्रज्ञान Google मॅप्स आणि इतर नेव्हिगेशन अॅप्समध्ये वापरला जातो. टोल कलेक्शन सिस्टिममध्ये GNSS चा वापर केल्यामुळे टोल प्लाझावर लांब रांगांची समस्या कमी होईल आणि टोलचा वापर अधिक पारदर्शक होईल. यामुळे वाहनधारकांना फास्टॅग प्रमाणेच सोयीचे आणि सुलभ टोल भरण्याचा अनुभव मिळणार आहे.
सध्या GNSS प्रणाली देशभरात लागू करण्यात आलेली नाही, पण कर्नाटक आणि हरियाणा राज्यांमध्ये या प्रणालीचा पायलट प्रोजेक्ट सुरू आहे. यशस्वी झाल्यानंतर ही प्रणाली संपूर्ण देशभर लागू केली जाईल. या निर्णयामुळे देशातील टोल सिस्टीम अधिक प्रभावी, पारदर्शक आणि सुरक्षेसाठी फायदेशीर ठरेल. भविष्यात, वाहनधारकांना जास्त अंतरावर प्रवास केल्यास त्या अंतरावर आधारित टोल आकारले जाईल, ज्यामुळे टोल शुल्क अधिक अचूक आणि न्याय्य होईल.





