‘बालाकोट 2.0’ ची चर्चा
भारत या दहशतवादी हल्ल्याला मोठे प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत असल्याचा दावा

जम्मू-काश्मीर : जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यात 26 पर्यटकांना जीव गमवावा लागला. दहशतवाद्यांनी हिंदू पर्यटकांना टार्गेट केले. त्यांचा धर्म विचारून गोळीबार केला. या भ्याड हल्ल्याने देशभरात संतापाची लाट उसळली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सौदी अरबचा दौरा अर्धवट सोडून भारतात परतले. त्यांनी दिल्ली विमानतळावरच उच्चस्तरीय बैठक घेतली. या बैठकीत परराष्ट्र मंत्री डॉ. जय शंकर, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल, परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री हे उपस्थित होते. या बैठकीनंतर भारत या दहशतवादी हल्ल्याला मोठे प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत असल्याचा दावा करण्यात येत आहे. आता बालाकोट 2.0 जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
रावळपिंडीत शिजला कट
या दहशतवादी हल्ल्याचा कट पाकिस्तानातील रावळपिंडीत शिजल्याचे समोर येत आहे. भारतातील हस्तकांच्या मार्फत पाकिस्तानातील दहशतवाद्यांनी हा हल्ला केल्याचे समोर आले आहे. 6 दहशतवाद्यांनी पर्यटकांना त्यांचा धर्म विचारून अंदाधुंद गोळीबार केल्याचे समोर आले आहे. दरम्यान भारताच्या भूमिकेकडे आता जगाचे लक्ष लागले आहे. तर पाकिस्तानमधील सरकारला पुन्हा कापरे भरले आहे. पाकिस्तानातील दहशतवादी अड्डे, प्रशिक्षण केंद्र पुन्हा रडारवर आले आहेत.
हेही वाचा – PCMC: पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या नव्या संकेतस्थळाचे लोकार्पण
दहशतवादी हल्ल्यावर चर्चा
या हल्ल्यात दोन काश्मीरी आणि इतर पाकिस्तानी दहशतवादी असल्याचे समोर येत आहे. दोन तुकड्यांमध्ये विभाजीत होत त्यांनी धर्म विचारून गोळीबार केला. या दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी लष्कर ए तैयबाची एक संघटना द रेजिस्टेंस फ्रंट TRF या दहशतवादी संघटनेने घेतली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सौदीवरून परतताच दिल्ली विमानतळावर उच्चस्तरीय बैठक घेतली. दरम्यान अगदी थोड्याच वेळात सकाळी 11 वाजता कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटी (CCS) ची बैठक होणार आहे. यामध्ये पुढील रणनीती ठरवण्यात येईल. विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परताना पाकिस्तानी एअरस्पेसचा वापर केला नाही. यातूनच मोठा संदेश गेला आहे.
‘बालाकोट 2.0’ ची चर्चा
2019 मध्ये पुलवामावर दहशतवादी हल्ला झाला होता. त्याचा बदला भारताने बालाकोट येथील दहशतवादी संघटनेवर एअर स्ट्राईक केली होती. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर सोशल मीडिया आणि संरक्षण तज्ज्ञांत ‘बालाकोट 2.0’ ची चर्चा सुरू झाली आहे. भारत पुन्हा सर्जिकल स्ट्राईक करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आता पाकिस्तानला कायमचा धडा शिकवण्याची मागणी सोशल मीडियावर करण्यात येत आहे.