वोडाफोन-आयडियाचे नेटवर्क डाऊन झाल्याने ग्राहकांमध्ये संतापाची लाट
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/10/vodafoneindia-is-trending-on-twitter-as-nework-is-down-in-pune-scaled-1.jpg)
तीन दिवसांपूर्वी ग्रीड फेल्युअरमुळे मुंबई-ठाणेकरांना विजेविना दिवस काढावा लागला होता. आज अर्ध्याहून अधिक महाराष्ट्राची मोबाईल नेटवर्कविना तारांबळ उडाली आहे. वोडाफोन-आयडियाचे नेटवर्क डाऊन झाल्याने ग्राहकांमध्ये संतापाची लाट उसळी आहे.
देशातील आघाडीची मोबाईल सेवा पुरवठादार असलेल्या वोडाफोन-आयडियाचे मोबाईल नेटवर्क पूर्णपणे ढेपाळले आहे. पुण्यात झालेल्या तांत्रिक बिघाडाने राज्याच्या निम्म्याहून जास्त सर्कलमध्ये ग्राहकांना Vi च्या कनेक्टिव्हिटी फेल्युअरचा त्रास सहन करावा लागत आहे. कंपनीच्या या ढिसाळ कारभारावर ग्राहकांनी सोशल मीडियावर जोरदार टीका केली आहे.
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/10/Capture-37.jpg)
राज्यातील काही भागात बुधवार रात्रीपासून Vi चे नेटवर्क गुल झाले आहे. विशेष म्हणजे पुणे आणि आसपास भागात Vi च्या ग्राहकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. मुंबईत देखील काही ठिकाणी Vi चे नेटवर्क डाउन झाले आहे.
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/10/1-6.jpg)
याबाबत Vi च्या ग्राहकांनी सोशल मीडियावर कंपनीबाबत पोलखोल केली. नेटवर्क नसल्याने ग्राहकांना कंपनीच्या ग्राहक सेवा केंद्राशी देखील संपर्क करणे अवघड बनले आहे. काहींनी ट्विटरवर Vi च्या नेटवर्कबाबत तीव्र नाराज व्यक्त केली आहे. यामुळे ट्विटरवर वोडाफोन टॉप ट्रेंडिंगमध्ये आला आहे. पुणे शहरात बुधवारी रात्री धुमाकूळ घातलेल्या पावसाने गेल्या दहा वर्षातील सर्व विक्रम मोडले. रात्री नऊ ते अकरा या दोन तासात संपूर्ण शहरात धुवाँधार पाऊस पडल्याने पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. कात्रज भागात काल रात्री अकरा वाजेपर्यंत तब्बल १५१ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. तर शिवाजीनगरला ९६ मिलीमीटर पाऊस पडला. कात्रज तलाव, टांगेवाला कॉलनीसह आणि अरणेश्वर परिसरातील नागरिकांना घरात पाणी शिरल्याने प्रशासनाला महापालिकेच्या शाळेत हलवावे लागले.
दरम्यान, वोडाफोन आयडियाने नेटवर्क इश्यू झाल्याचे मान्य केले आहे. त्यावर काम सुरु असून किमान पाच ते सहा तसंच अवधी लागेल, असे कंपनीने म्हटलं आहे. ग्राहकांनी केलेल्या प्रश्नांच्या भडीमारावर कंपनीने नेटवर्क पूर्ववत करण्यासाठी किमान सहा तास लागतील, असे म्हटलं आहे. बुधवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे काही ठिकाणी नेटवर्कमध्ये बिघाड झाल्याचे कंपनीने म्हटलं आहे. पुणे, मुंबई, नाशिक , नागपूर या महानगरांमध्ये वोडाफोन ग्राहकांचा संपर्क तुटला आहे.