महाराष्ट्रातील आणखी एका बँकेचा आरबीआयकडून परवाना रद्द
कोल्हापूर – बँकेच्या कारभारातील समस्यांच्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने कोल्हापरातील सभद्रा लोकल एरिया बँकेचा बँकींग परवाना रद्द केला आहे. नुकताच आरबीआयने कराड जनता सहकारी बँकेचा परवाना रद्द केला होता.
बँकेच्या गैरकारभारामुळे कोल्हापुरच्या सुभद्रा लोकल एरिया बँकेचा बँकींग परवाना रद्द करत असल्याची माहिती २४ डिसेंबोरला देण्यात आली. गुरुवारपासूनच बँकेचं कामकाज बंद करण्यात आलं आहे. रिझर्व्ह बँकेने आधीच सुभद्रा बँकेच्या व्यवहारावर निर्बंध आणले होते. त्यानंतर आता ही कारवाई करण्यात आली. दरम्यान यामुळे ठेवीदारांमध्ये खळबळ उडाली आहे.
आरबीआयने कारवाईमागील कारण सांगताना माहिती दिली आहे की, सुभद्रा बँकेचे कामकाज सध्याच्या आणि भविष्यातील ठेवीदारांच्या हितासाठी हानिकारक ठरेल अशा पद्दतीने करण्यात आले होते. अशाच पद्दतीने त्यांना कामकाज सुरु ठेवण्याची परवानगी दिली तर जनतेच्या हितावर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
आरबीआय यासंबंधी उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार आहे. दरम्यान सुभद्रा लोकल एरिया बँके सर्व ठेवीदारांची भरपाई करण्यास समर्थ असल्याचं आरबीआयने स्पष्ट केलं आहे. कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात बँकेच्या एकूण १३ शाखा आहेत. 2003 मध्ये उद्योगपती अण्णासाहेब मोहिते यांनी या बँकेची स्थापना केली होती.





