महात्मा गांधींचा स्वातंत्र्य लढा एक मोठं नाटक : भाजप खासदार अनंतकुमार हेगडे

बंगळुरु – “महात्मा गांधींचा स्वातंत्र्य लढा हे केवळ एक मोठं नाटक होतं”, असं वादग्रस्त वक्तव्य भाजपचे खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री अनंतकुमार हेगडे यांनी केलं आहे. यावेळी हेगडे यांनी महात्मा गांधी यांच्या महात्मा उपाधीवरही प्रश्न उपस्थित केले. अशा लोकांना महात्मा कसं म्हटलं जाऊ शकतं? असा प्रश्न हेगडे यांनी विचारला. ते बंगळुरुमध्ये एका कार्यक्रमात बोलत होते. त्यांच्या या वक्तव्यावर जोरदार टीका होत आहे.
अनंतकुमार हेगडे म्हणाले, “संपूर्ण स्वातंत्र्य लढ्याची चळवळ ब्रिटिशांच्या परवानगीने आणि पाठिंब्याने सुरु होती. स्वातंत्र्य लढ्यातील एकाही कथित नेत्याला ब्रिटिशांनी एकदाही मारलं नाही. त्यांची स्वातंत्र्य चळवळ एक मोठं नाटक होती. त्यांची संपूर्ण चळवळ खरा संघर्ष नव्हती, तर ब्रिटिशांच्या परवानगीने केलेली ‘तडजोड स्वातंत्र्य चळवळ’ होती.”
महात्मा गांधींचा सत्याग्रह आणि त्यांचं उपोषण हे देखील नाटकच असल्याचा गंभीर आरोप हेगडे यांनी केला आहे. जे लोक काँग्रेसला पाठिंबा देत आहेत ते म्हणतात की आमरण उपोषणामुळे आणि सत्याग्रहामुळे भारताला स्वातंत्र्य मिळालं. मात्र हे खरं नाही. ब्रिटीश सत्याग्रहामुळे भारत सोडून गेले नाही. ब्रिटिशांनी निराशेतून भारताला स्वातंत्र्य दिलं. जेव्हा मी इतिहास वाचतो तेव्हा माझं शरिरातील रक्त खवळतं. आपल्या देशात कसे लोक महात्मा झाले आहेत, असंही हेगडे म्हणाले.





