” तिळगूळ घ्या आणि गोड गोड बोला”…

आपल्या भारतीय संस्कृती, परंपरांना आणि सणांना ऐतिहासिक महत्व आहे…असे अनेक सण आहे ज्यांना धर्माच्या,ग्रंथांच्या,आधारावर नियमानुसार साजरं केलं जातं. मकर महिन्यात कृष्णा पंचमीवर देशातील बहुतेक सर्व राज्यांमध्ये मकर सक्रांत हा सण साजरा केला जातो. वेगवेगळ्या सांस्कृतीत मकर संक्रांत वेगवेगळ्या स्वरुपात साजरी केली जाते.
मकर संक्रांत भारताच्या विविध राज्यात विविध नावाने आणि विविध पद्धतीने साजरी केली जाते जसे मकरसंक्रात – त्याचप्रमाणे मकरसंक्रांत या सणाची वेगवेळ्या राज्यात वेगवेगळी नावं आहेत. जसं, महाराष्ट्रात मकरसंक्रात, तामिलनाडुमध्ये पोंगल , गुजरात व राजस्थानमध्ये उत्तरायण , पंजाबमध्ये लोहरी, ओडिसामध्ये माघमेला, आसाममध्ये भोगाली बिहु तर, कर्नाटक, केरळ, आंध्रप्रदेश, बिहारमध्ये संक्रांती अशी विविध नावं या सणाला आहेत.

‘मकर’ हा शब्द मकरराशीला संबंधित आहे, तर ‘संक्रांती’ याचा अर्थ संक्रमण असा आहे. मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्य धनु राशीपासून मकर राशीत प्रवेश करतो. एक राशीला सोडून दुसर्या राशीत प्रवेश करण्याच्या प्रक्रियेस संक्रांती म्हणतात. सूर्य मकर राशीत प्रवेश करत असल्याने या वेळेस ‘मकर संक्रांती’ असे म्हणतात. हिंदू महिन्यानुसार, मकर संक्रांती उत्सव पौष शुक्ल पक्षामध्ये साजरा केला जातो.कृष्ण आणि शुक्ल पक्ष या दोन भागानुसार उत्तरायण आणि दक्षिणयान असे वर्षाचे दोन भाग आहेत. या दिवसापासून सूर्य उत्तरायण होतो. उत्तरायण म्हणजे त्या काळापासून पृथ्वीचा उत्तर गोलार्ध सूर्याकडे वळतो, त्यानंतर सूर्य उत्तरेकडून निघू लागतो. त्याला सोमयान असेही म्हणतात. उत्तरायण हा मकर संक्रांती ते कर्करोग संक्रांती दरम्यानचा 6 महिन्यांचा कालावधी आहे.
महाभारतात कुरु वंशाचे संरक्षक भीष्म हे बाणांच्या शय्येवर (शरशय्येवर) उत्तरायणाची वाट पहात पडून होते. त्यांना इच्छामरणाचे वरदान होते. ज्या दिवशी उत्तरायण सुरू झाले त्यादिवशी त्यांनी प्राणत्याग केला. भारतीय परंपरेत उत्तरायणाचा काळ दक्षिणायनापेक्षा अधिक शुभ मानला जातो.
मकरसंक्रांतीच्या आदल्या दिवशी येते ती भोगी हा सण साजरा केला जातो…या दिवशी सर्व शेंगभाज्या, फळभाज्या यांची तिळाचा कूट घालून केलेली मिश्र भाजी, तीळ लावलेली बाजरीची भाकरी, लोणी अणि मुगाची खिचडी असे पदार्थ आवर्जून केले जातात. संक्रांतीच्या दिवशी गुळाची पोळी आणि तिळगुळाचे विशेष महत्त्व असते.मकर संक्रात हा सण आहाराच्या दृष्टीनेही महत्वाचा असतो…संक्रांतीला तिळाचे फार महत्त्व आहे. हा काळ थंडीचा असतो. त्यामुळे अंगात उष्णता निर्माण होण्यासाठी तीळापासून बनवलेले पदार्थ खातात..जसं तिळाचे लाडू किंवा पोळी, तसेच तीळ लावून केलेली बाजरीची भाकरी, लोणी, मुगाची खिचडी, वांगी, सोलाणे,पावटे, गाजर अशा इतर शक्तिवर्धक पदार्थांचा वापर जेवणात केला जातो.

महाराष्ट्रातील मकर संक्रात हा सण तीन दिवस साजरा करतात. यास भोगी, संक्रांत व किंक्रांत अशी नावे आहेत. संक्रांतीस नातेवाईकांना आणि मित्रमंडळींना तसेच लहान मुलांना तिळगुळ वाटतात. तसेच सर्वजण ‘तिळगुळ घ्या आणि गोड बोला’ असे सांगून सर्वांना तिळगूळ वाटतात… स्त्रिया यादिवशी हळदी-कुंकवाचा कार्यक्रम करतात. रथसप्तमी हा संक्रांतीच्या हळदीकुंकवाचा शेवटचा दिवस असतो. मराठी स्त्रिया संक्रांतीच्या दिवशी आवर्जून काळी साडी नेसतात.

मकरसंक्रांतीला तिळगूऴ देण्याचा अर्थ म्हणजे स्हेनसंबंध तिळाप्रमाणए कायम गोड राहवे…किंवा कोणाबद्दल काही राग,रुसवा -फुगवा असेन तर, तो मानतून काढून टाकून पुन्हा नात्यात गोडवा निर्माण करण्याचा आणि जुनी नाती समृद्ध करण्याचा एक उत्तम दिवस म्हणजे मकर संक्रांत आणि तिळगुळ म्हणजे त्यावरचा रामबाण उपाय…म्हणून तर हातावर तीळगूळ ठेवत किंवा तोंडात प्रेमाणे तिळगूळ भरवत ”तिळगूळ खा आणि गोड गोड बोला” असं म्हणण्याची पद्धत आहे.

मकर संक्रांत शेतक-यांसाठीही तितकाच महत्वाचा सण असतो.या दिवसापासून वसंत ऋतुला सुरुवात होते आणि बीजांना अंकुर फुटतात. दरम्यान खरीप पिकांची कापणी झालेली असते आणि रबी पिकांची पेरणी होते.यामुळे हा शेतकऱ्यांसाठी महत्वाचा सण मानला जातो.

शेतक-यांप्रमाणे हा सण नवविवाहित वधूसाठीही महत्वाचा आणि आनंदाचा असतो. नवविवाहितेला विवाहानंतरच्या प्रथम संक्रांतीला काळी साडी भेट दिली जाते. हलव्याचे दागिने मुलीला व जावयालाही देऊन त्यांचे कौतुक केले जाते. त्यालाच तिळवण असं म्हणतात.

लहान बालकांनाही संक्रांतीनिमित्त काळ्या रंगाचे कपडे घातले जातात तसेच त्यांना हलव्याचे दागिने घातले जातात…चुरमुरे, बोरे, हरभरे, उसाचे तुकडे, हलवा असे मिश्रण लहान मुलांच्या डोक्यावर ओततात. अलीकडे यामधे गोळ्या, छोटी बिस्किटे घालण्याची हौसही दिसते. तसेच या मिश्रणामध्ये लहान मुलांची आवडती चॅाकलेट्सही घालतात. याला बोरन्हाण अथवा लूट असे म्हणतात. बालकांच्या वयाच्या पाचव्या वर्षापर्यंत बोरन्हाण केले जाते.


संक्रांत या उत्सवास पतंग महोत्सव म्हणुनही ओळखले जाते. या दिवशी छोट्या मुलांपासून मोठ्यापर्यंत पतंग उडवतात. पतंग उडवण्यामागचे महत्वाचे कारण म्हणजे काही तास सुर्यप्रकाशात घालवणे जे आरोग्यासाठी लाभदायक ठरते. गुजराथ मध्ये पतंग महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.

संक्रांतीला काळे कपडे का घातले जातात ?
काळ्या रंगाच्या बाबतीत अनेक शुभ – अशुभच्या कल्पना जोडल्या गेल्या आहेत…कोणत्याही शुभकार्याला काळ्या रंगाचे कपडे परिधान करणे अशुभ मानलं जातं. त्यामुळे काही अनेकांना काळा रंग आवडत असतानाही काळ्या रंगाचे कपडे परिधान करता येत नाही. पण मकर संक्रांतीला आवर्जून काळ्या रंगाचे कपडे घातले जातात.मकर संक्रात हा सण ऐन हिवाळ्यात येतो.काळा रंग हा उष्णता शोषून घेऊ शरीर उबदार ठेवण्यात मदत करत. त्यामुळे मकर संक्रांतीला ‘काळा रंग अशूभ रंग’ या संक्लपनेला बगल देत आवर्जून काळ्या रंगाचे कपडे परिधान केले जातात…
मयुरी सर्जेराव…





