कोरोनावर इंजक्शन आहे, पण आपल्याला परवडणारं नाही : शरद पवार

सातारा : संपूर्ण देशात कोरोना विषाणूनं थैमान घातलं आहे. देशात सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आहेत. त्यात जुलै आणि ऑगस्ट महिन्यात आणखी मोठी भर पडणार आहे, अशी आरोग्य यंत्रणेने मोठी चिंता व्यक्त केली आहे. कोरोनावर इंजेक्शन निघालं आहे. पण ते आपल्याला परवडणारं नाही, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली आहे. शरद पवार आज सातारा दौऱ्यावर आहेत. पत्रकार परिषदेला संबोधित करतांना ते म्हणाले की, आता आपल्याला कोरोना सोबतच जगावं लागणार आहे. आत्मविश्वासानं उभं राहणं, स्वत:ची काळजी घेणं, हाच पर्याय आहे. कोरोनावर इंजेक्शन निघालं आहे. पण, आपल्याला ते परवडणारं नाही. आपल्या देशात मिळत नाही. 30 ते 35 हजार रुपये आपल्या माणसाला परवडणारं नाही.
मुंबई-पुण्यातून बाहेर गेलेली लोक पुन्हा येऊ लागली आहेत. त्यामुळे कोरोना रुग्ण आणखी वाढण्याची भीती शरद पवार यांनी व्यक्त केली आहे. कोरोना सगळीकडे सारखा आहे. पण इथले माध्यम जास्त जागरूक आहेत. त्यामुळे बाहेरून आलेल्या लोकांना जास्त भीती होती, इथला कोरोना बाहेर गेला, अशा शब्दांत शरद पवार यांनी माध्यमांनाही टोला लगावला. पवार यांनी सांगितलं की, घरात बसून त्यांनी खूप काम केलं. राज्याच्या बाहेर देशाच्या बाहेर अडकलेल्या विद्यार्थ्यांना घरी आणलं. बाहेरच्या राज्यातल्या लोकांशी संपर्क असल्यानं बाहेर अडकलेल्या लोकांना पुन्हा मायदेशात आणता आलं.UPSC साठी बाहेरच्या राज्यात अडकलेल्याना आपल्या देशात आणण्यासाठी जास्त वेळ गेला. दरम्यान, शरद पवार यांच्याविषयी गोपीचंद पडळकर यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर महाराष्ट्रातील राजकारण चांगलंच ढवळून निघालं आहे.





