शहरात कसबा, नाना पेठेसह अन्य; पाण्यासाठी रस्त्यावर उतरू
पुणे | शहरात कसबा, नाना पेठेसह अन्य भागांमध्ये कमी-जास्त दाबाने पाणीपुरवठा होत आहे. येत्या तीन दिवसांत शहराचा पाणीपुरवठा सुधारला नाही, तर नागरिक रस्त्यावर येतील. त्यांच्या आंदोलनाचे आपण नेतृत्व करू,’ असा इशारा खासदार गिरीश बापट यांनी दिला. तत्पूर्वी शहराच्या पाणी प्रश्नावरून बापट यांनी कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत अधिकाऱ्यांचा निषेध करीत सभात्याग केला.
‘महापालिका प्रशासनाचा निषेध करून बैठकीतून सभात्याग करून बाहेर पडलो आहे. शहराला पाण्याची कमी नाही. पुण्याला भामा आसखेड, टेमघरमधून पाणी दिले जात आहे, असे पाटबंधारे विभागाचे अधिकारी सांगत आहे. विविध ठिकाणी टँकरही चालू आहेत. गेली दोन ते तीन दिवस पुण्यात सामान्य नागरिकांना अंत्यत कमी दाबाने, तर काही ठिकाणी पाणीच मिळत नाही. ही प्रशासनाची चूक आहे. पाणीपुरवठा वितरणात त्रुटी आहेत. नियमित आणि जास्त दाबाने पाणीपुरवठा झाला पाहिजे, अशी मागणी केली आहे,’ असे खासदार गिरीश बापट यांनी पत्रकारांना सांगितले.
‘लोकप्रतिनिधींचा अंकुश नसल्याने प्रशासनाचा मनमानी कारभार असाच सुरू राहिल्यास आणि पुणेकरांना वेठीस धरल्यास त्या-त्या अधिकाऱ्यांविरोधात आंदोलन करू. त्यांना आपण सोडणार नाही,’ असा सज्जड दमही बापट यांनी दिला. रविवारी चार वाजता आयुक्तांच्या घरी जाऊन पाण्याचा दाब पाहणार आहे. त्यांच्या घरापासून ते बागेपर्यंत पाणी किती दाबाने येत आहे, त्याची पाहणी करणार आहे. काही ठिकाणी चावीवाले असतात, त्यांच्यावर खात्यातील अधिकाऱ्यांचे दबावतंत्र सुरू आहे,’ असा आरोप करून हे प्रकार बंद झाले पाहिजेत, असे बापट म्हणाले.
अनेक ठिकाणी कमी दाबाने पाणीपुरवठा सुरू असण्यामागे शहरातील टँकर लॉबी सक्रिय आहे का, अशी शंका खासदार बापट यांनी उपस्थित केली. टँकरही आपण तपासणार आहोत. शहरातील माजी नगरसेवक कोणत्या भागात किती टँकर सुरू आहेत, कोणत्या भागात कमी दाबाने पाणीपुरवठा सुरू आहे याची पाहणी करतील. पंचतारांकित हॉटेलमध्ये पाण्याचा प्रश्न सतावत नाही. मग, कसबा, नाना पेठेत पाण्याचा प्रश्न का भेडसावतो आहे, असाही सवाल बापट यांनी केला.
खंडित झालेला वीजपुरवठा आणि दुरुस्तीच्या कामामुळे पाणीपुरवठा कमी-जास्त दाबाने होत होता. येत्या दोन दिवसांत शहरातील सर्व भागांत पाणीपुरवठा सुरळीत होईल.
– विक्रमकुमार, आयुक्त, पुणे महापालिका