कुठे तुकाराम महाराज आणि कुठे बागेश्वर? मुंबईतील कार्यक्रमावरून जितेंद्र आव्हाडांची टीका
संत तुकाराम महाराज यांच्या पायाच्या नखाचीही सर त्या व्यक्तीला नाही
मुंबई : बागेश्वर धामचे पीठाधीश्वर धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांचा मुंबईतील मीरा-भाईंदरमध्ये दरबार होणार आहे. निवेदक धीरेंद्र कृष्ण शास्त्री येथे दोन दिवस प्रवचनाद्वारे निरुपण करणार आहेत. भाजपने या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी टीका केली आहे.
जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या पायाच्या नखाचीही सर ज्या व्यक्तीला नाही अशा बागेश्वरला काही लोक महाराज म्हणातात. त्याचा कार्यक्रम महाराष्ट्रात होतो आहे. कुठे तुकाराम महाराज आणि कुठे बागेश्वर? तरीही लोक त्याला मोठं करत आहेत. तुकाराम महाराजांचा अपमान करणाऱ्या बागेश्वरचं किर्तन महाराष्ट्रात होणं हा दुर्दैवी प्रकार आहे. ज्यांनी हा कार्यक्रम ठेवला आहे ते १०० टक्के महाराष्ट्र द्रोही आहेत, अशी टीका जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे.
महाराष्ट्राच्या भूमीवर जगद्गुरू तुकाराम महाराज यांच्याबाबत जे वक्तव्य त्या बागेश्वरने केलं आहे ते मन दुखावणारं आहे. महाराष्ट्राच्या मातीचा, सस्कृतीचा अपमान करणारं ते वक्तव्य आहे. मी त्या बागेश्वरला बाबा म्हणतच नाही. या बागेश्वरच्या संपुर्ण कुटुंबाची अक्कल ही तुकाराम महाराजांच्या पायाच्या नखाइतकीही नाही. कुठे तुकाराम महाराज आणि कुठे हा बागेश्वर? मतं पडणार नाहीत असं वाटत असतं तेव्हा काही जणांना हौस असते अशा लोकांना मोठं करायची. मतं मिळत नाहीत हे दिसू लागलं की असं काहीतरी थोतांड करायचं. तुकाराम महाराजांविषयी बोलणाऱ्या बागेश्वरला सन्मान मिळणार असेल तर हा महाराष्ट्राचा अपमान आहे. कारण ज्याने तुकाराम महाराजांचा अपमान केला त्याने मह्राराष्टाचा अपमान केला. अशा माणसाचा कार्यक्रम घेणारे लोक महाराष्ट्र द्रोही आहेत, महाराष्ट्र द्वेषी आहेत, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले.