Janta Darbar : गटविकास अधिकाऱ्यांसमोर गाऱ्हाणे मांडण्याची पहिल्या शुक्रवारी सुविधा : ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ
मुंबई । महाईन्यूज । प्रतिनिधी
राज्यात प्रत्येक तालुक्यातील जनतेच्या तक्रारी सोडविण्यासाठी प्रत्येक महिन्याच्या पहिल्या शुक्रवारी सकाळी 11 वाजता गटविकास अधिकाऱ्यांनी पंचायत समिती कार्यालयात बैठक आयोजित करण्याचे निर्देश शासन परिपत्रकाद्वारे देण्यात आले आहेत. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी सामान्य जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी जनता दरबारच्या धर्तीवर अधिकाऱ्यांना या विशेष सूचना केल्या आहेत, अशी माहिती राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.
महिन्याच्या प्रत्येक शुक्रवारी होणाऱ्या या सभेत जनतेच्या तक्रारी, गाऱ्हाणी, अडचणी सोडवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या सभेबाबत ग्रामपंचायत तसेच पंचायत समितीमध्ये आलेल्या लेखी तक्रारीतील सर्व तक्रारदारांना सभेपूर्वी 8 दिवस आधी माहिती देण्यात येणार आहे. या सभेअंतर्गत होणाऱ्या कार्यवाहीचा तपशील संबंधित जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना देण्याच्या सूचना देखील परिपत्रकात करण्यात आल्या आहेत. लोकांना या बैठकीस उपस्थित राहून थेट गटविकास अधिकाऱ्यांकडे आपल्या अडचणी मांडता येणार आहेत, असेही मंत्री हसन मुश्रीफ यांनी म्हटले आहे.