breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

राणा दाम्पत्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करणं चुकीचं; कोर्टाने राज्य सरकारला फटकारले

मुंबई |

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ‘मातोश्री’ या खासगी निवासस्थानी हनुमान चालिसा पठणाचा इशारा दिल्यामुळे राजद्रोहाच्या गुन्ह्यात तुरुंगात असणाऱ्या अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा (Navneet Rana And Ravi Rana) यांना सत्र न्यायालयाने बुधवारी जामीन मंजूर केला. न्यायालयाने याबाबत दिलेल्या आदेशाची सविस्तर प्रत (Sessions Court Order) आज उपलब्ध झाली असून राणा दाम्पत्याला जामीन मंजूर करताना न्यायालयाने राज्य सरकारला चांगलंच फटकारल्याचं स्पष्ट झालं आहे.

‘राणा दाम्पत्याविरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम १२४-अ नुसार राजद्रोहाचा आरोप सिद्ध होत नाही,’ असं निरीक्षण कोर्टाने जामीन आदेशात नोंदवलं आहे. तसंच मुंबई पोलिसांनी नवनीत राणा आणि रवी राणा यांना नोटीस बजावल्यानंतर ते दोघेही खार येथील निवासस्थानातून बाहेर पडले नव्हते, तसंच त्यांनी आपलं आंदोलनही मागे घेतलं होतं. त्यानंतरही त्यांच्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करणं चुकीचं असल्याचं सांगत कोर्टाने राज्य सरकारवर ताशेरे ओढले आहेत.

आरोपींनी मुख्यमंत्र्यांविरोधात व्यक्त केलेल्या भावना या आक्षेपार्ह असल्या तरी राजद्रोहच्या गुन्ह्याबाबत आवश्यक असलेले घटक दिसत नाहीत, असेही निरीक्षण आमदार-खासदार यांच्याविरोधातील प्रकरणांची सुनावणी घेणाऱ्या विशेष कोर्टाचे न्यायाधीश राहुल रोकडे यांनी आदेशात नोंदवले आहे.

दरम्यान, बुधवारी कोर्टाने जामीन मंजूर केल्यानंतर सर्व प्रक्रिया पार पडल्यानंतर गुरुवारी राणा दाम्पत्य तुरुंगातून बाहेर पडले. अटकेत असताना नवनीत राणा आणि रवी राणा या पती-पत्नीची रवानगी वेगवेगळ्या ठिकाणी करण्यात आली होती. त्यामुळे तब्बल १२ दिवसानंतर तुरुंगातून सुटताच रवी राणा हे नवनीत राणांची भेट घेण्यासाठी गेले. यावेळी नवनीत राणा यांना अश्रू अनावर झाल्याचं पाहायला मिळालं.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button