ताज्या घडामोडी

राष्ट्रपती राजवट सोपी आहे का, भुजबळांचा भाजपला टोला

नाशिक | राज्यातील राजकीय वातावरण खराब करून राष्ट्रपती राजवट लागू करण्याची एकमेव भाषा विरोधक करीत आहेत. भाजप म्हणजे जनता आहे का, राष्ट्रपती राजवट लागू करणे इतके सोपे आहे का, असा सवाल अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी भाजपला केला आहे. राज्यातील परिस्थिती बिघडली असती तर, किरीट सोमय्या दिल्लीला जाऊ शकले नसते, असा टोलाही भुजबळांनी लगावला आहे. खासदार नवनीत राणा मागासवर्गीय आहेत की नाहीत, यावरच प्रश्नचिन्ह असून त्यांच्या जातीच्या दाखल्याबाबत सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असल्याचे भुजबळांनी यावेळी सांगितले.

नाशिकमध्ये पत्रकारांशी बोलताना भुजबळ यांनी भाजप नेत्यांसह राणा पती-पत्नीवर टीका केली. किरीट सोमय्या यांना पोलिस स्टेशनमध्ये जाण्यास पोलिसांनी मज्जाव केला होता. तरीही ते गेले असे भुजबळ यांनी सांगितले. दगडफेकीनंतर त्यांचे रक्त खाली उतरतही नव्हते, तरी सौमय्या ते रक्त पुसत नव्हते असा टोलाही भुजबळांनी सोमय्या यांना हाणला. राज्यात राष्ट्रपती राजवट लावण्यासारखी परिस्थिती नाही. परंतु, तरीही वातावरण खराब करून राष्ट्रपती लागू करा अशी एकमुखी मागणी भाजप नेते करीत आहेत. दिल्लीत गोळीबार झाला तेव्हा काय झाले होते, याची आठवणही भुजबळांनी यावेळी भाजपला करून दिली. शिवसेनेला डिवचणे योग्य नसल्याचे सांगत, बाळासाहेब ठाकरेंनी आपल्या घरातच मुस्लिमांना नमाज पठण करायला जागा उपलब्ध करून दिल्याचा दाखलाही भुजबळांनी यावेळी दिला. हा श्रद्धेचा विषय असतानाही त्याला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. शिवसेनेने लता मंगेशकर असताना त्यांना मोठी मदत केली. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पुरस्कार वितरणात बोलावणे अपेक्षित होते. परंतु, त्यांना मुख्यमंत्र्यांपेक्षा पंतप्रधान नरेंद्र मोदींना बोलवणे महत्त्वाचे असल्याचा टोलाही त्यांनी मंगेशकर कुटुंबाला हाणला.

राणा मागासवर्गीय कशा?

पोलिसांनी अटक केल्यानंतर आपण मागासवर्गीय असल्यामुळे पोलिसांनी आपल्यावर अन्याय केल्याचा आरोप खासदार राणा यांनी केल्यानंतर भुजबळ यांनी राणांना टोला लगावला. सरकार आणि पोलिसांमध्येही मागासवर्गीय आहेत. कायदा सर्वांना सारखाच असून कारवाई झाली की स्वत:ला मागासवर्गीय म्हणणे चुकीचे आहे. मुळात नवनीत राणा मागासवर्गीय आहेत की नाही यावरच प्रश्नचिन्ह आहे. सर्वोच्च न्यायालयात याबाबत सुनावणी सुरू असल्याची आठवण त्यांनी यावेळी करून दिली.

पुणे रेल्वेसाठी हेक्टरी सव्वा कोटी!

पामतेलावर सारवासारव

इंडोनेशियाने पामतेल निर्यातीवर बंदी आणली आहे. तेलाचे भाव वाढू शकतील याकडे कसे बघता, या प्रश्नावर ‘मी चांगल्या दृष्टीने बघतो. सगळीकडे भाववाढ होतेय. पेट्रोल डिझेल दरवाढ झाली, तसे पामतेलाची दरवाढ झाली’ असे म्हणत भुजबळ यांनी प्रश्न टोलवला. परंतु, आपण त्या खात्याचे मंत्री असल्याचे लक्षात येताच, त्यांनी यामुळे महागाई वाढेल असे सांगत सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. मागणी-पुरवठ्यावर बाजारभाव अवलंबून असल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button