IPL सट्ट्यात झाला कर्जबाजारी, तीन मुलींना मारून केली आत्महत्या
आयपीएल क्रिकेट सामन्यांवर लावलेल्या सट्ट्यामध्ये सर्व गमावल्यामुळे कर्जबाजारी झालेल्या एका व्यक्तीने आपल्या तीन मुलींना विष तर दिलंच पण त्यासोबत स्वत:ही विष खाऊन आत्महत्या केली आहे. वाराणसी येथे ही हृदयद्रावक घटना घडली आहे. दीपककुमार गुप्ता असे मृत व्यक्तीचे नाव आहे. निबिया (९ वर्ष), अद्वितीय (७ वर्ष) आणि रिया (५ वर्ष) असे मृत मुलींची नावे आहेत. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.
वाराणसी जिल्ह्यातील लक्सा येथे दीपककुमार कपड्यांच्या दुकानात काम करायचा. काही दिवासांपूर्वी त्याची पत्नी माहेरी गेली होती. त्यामुळे तिचा जीव बचावला. मात्र, पती आणि मुलींच्या मृत्यूमुळे त्यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. एकाच कुटुंबातल्या चौघांच्या मृत्यूमुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे.
स्थानिक प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार, दीपक आणि पत्नीमध्ये सतत भांडणे व्हायची. पत्नीला माहेरी गेल्यानंतर दीपक गेल्या काही दिवसांपासून आयपीएलवरील सामन्यावर सट्टा लावत होता. मात्र, सट्ट्यामध्ये दीपक सर्व काही गमावला आणि कर्जबाजारीही झाला. कर्जाची रक्कम फेडता येणार नाही म्हणून त्यानं आयुष्य संपवले. आयुष्य संपवताना त्याने पोटच्या तीन मुलींनाही विष दिलं. विष प्राशन केल्याचे समजताच स्थानिकांनी रूग्णालयात दाखल केले मात्र, उपचारादरम्यान चारही जणांचा मृत्यू झाला.
मृत दीपकच्या पुतणीने प्रसार माध्यमांना सांगितले की, काकांच्या तीन मुली अंगणात झोपल्या होत्या. त्यावेळी काका तिथे आले आणि घरात घेऊन गेले. त्यानंतर काही वेळानं मुलीने आजीला वडिलांनी काहीतरी खायला दिल्याचं सांगू लागली. त्यावेळी काकांनी तेथून पळ काढत शौचालयात गेले. काही वेळातच चारही जणांना उटल्याचा त्रास सुरू झाला.
शेजाऱ्यांनी सांगितलेल्या माहितीनुसार, दीपक आणि त्याच्या पत्नीमध्ये दररोज भांडणं व्हायची. भांडणं झाल्यामुळे दीपकनं पत्नीला माहेरी सोडलं होते. सततच्या भांडणामुळे दीपक तणावाखाली होता, म्हणूनच दीपकनं मुलांच्या जेवणात विष कालवलं आणि स्वत:ही विष घेतलं असेल. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.