breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

महाराष्ट्र एकीकरण समितीचे शहराध्यक्ष दीपक दळवी यांच्यावर शाई हल्ला..!

  • संतप्त कार्यकर्त्यांनी बेळगाव बंदची केली घोषणा

मुंबई |

महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दीपक दळवी यांच्यावर हल्ला करत काळी शाई फेकण्यात आली. एका महामेळाव्या दरम्यान कन्नड वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी दीपक दळवी यांच्यावर काळी शाई फेकून हल्ला केला. या घटनेचा महाराष्ट्र एकीकरण समितीने निषेध नोंदवला आहे. यावेळी कर्नाटक सरकार बेळगावमधील मराठी जनतेवर अत्याचार करत असल्याचा आरोप समितीच्या पदाधिकाऱ्यांनी केला. सीमालढ्याचे प्रमुख केंद्र असलेल्या बेळगावात कन्नड भाषकांची अरेरावी आज पुन्हा दिसून आली.महाराष्ट्र मध्यवर्ती एकीकरण समितीचे बेळगाव शहर अध्यक्ष दीपक दळवी यांच्यावर त्यांनी शाई फेकली.या प्रकारामुळे सीमाभागात संताप व्यक्त केला जात असून या घटनेच्या निषेधार्थ मराठी भाषकांच्या वतीने उद्या मंगळवारी बेळगाव बंदचे आयोजन करण्यात आले आहे.

कर्नाटक सरकारचे हिवाळी अधिवेशन बेळगाव येथे आयोजित करण्यात आले आहे. त्याला विरोध म्हणून महाराष्ट्र एकीकरण समितीने महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी समिती कार्यकर्त्यांनी महामेळाव्याची व्हॅक्सिन डेपो येथे जय्यत तयारी करण्यात आली होती. आज या ठिकाणी करवे येथील कन्नड वेदिका रक्षण समितीच्या काही कार्यकर्त्यांनी एकीकरण समितीचे शहराध्यक्ष दीपक दळवी यांच्याशी चर्चा करायचे असल्याचे सांगून बाजूला नेले. तेथे त्यांच्यावर शाई फेकून ते पळून गेले. हा प्रकार घडल्या नंतर उपस्थित मराठी भाषकातून तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. कन्नड गुंडांवर कारवाई करण्यात यावी, या मागणीच्या घोषणा देण्यात आल्या.

एकीकरण समितीच्या युवा आघाडीचे अध्यक्ष शुभम शेळके यांनी दीपक दळवी यांचा अपमान हा समस्त मराठी भाषकांचा अपमान असल्याचे सांगितले. या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ मंगळवारी बेळगाव बंदचे आयोजन करण्यात आल्याची घोषणा त्यांनी केली. हल्लेखोरांवर शासनाने कडक कारवाई करावी अन्यथा त्यांना आमच्या ताब्यात द्यावे. त्यांचे काय करायचे ते आम्ही पाहून घेऊ, असा इशाराही त्यांनी दिला.

पोलिसांच्या समोर दळवी यांच्यावर हल्ला झाला. त्यामुळे हल्ला होत असताना पोलीस काय करत होते, असा सवाल पदाधिकाऱ्यांनी उपस्थित केला आहे. कर्नाटक सरकार, बेळगावमधील सत्ताधारी आणि काही कन्नड संघटना पोलिसांच्या मदतीने बेळगावमधील मराठी माणसावर अत्याचार करत आहेत. दरम्यान, दीपक दळवी यांच्यावर झालेल्या हल्ल्याबाबत पोलीस स्थानकात तक्रार नोंदवली जाणार असल्याचं पदाधिकाऱ्यांनी सांगितलं. “कर्नाटकमध्ये मराठी माणसावरील हल्ले आणि अत्याचार वाढत आहे. त्यामुळे मराठी माणसानं सोबत येणं गरजेचं आहे. या घटनेचा निषेध नोंदवण्यासाठी उद्या मंगळवारी कडकडीत बेळगाव बंद पाळला जाणार आहे,” अशी घोषणा पदाधिकाऱ्यांनी केली. कर्नाटकने कितीही अत्याचार केला, तरी आम्ही शांत बसणार नाही, आम्ही आमचा लढा सुरू ठेवू, अशी भूमिका यावेळी पदाधिकाऱ्यांनी मांडली.

  • महाराष्ट्राच्या भूमिकेवर टीकास्त्र

गेली ६४ वर्षे बेळगावसह सीमा भागातील मराठी भाषक शांततेच्या मार्गाने महाराष्ट्रात समाविष्ट होण्यासाठी लढा देत आहेत. तरीही सीमावासिकांच्या नेत्यांवर अशाप्रकारे हल्ला करणे दुर्देवी आहे. आता तरी महाराष्ट्राने आणि महाराष्ट्र शासनाने प्रखरपणे आवाज उठवला पाहिजे; अन्यथा त्यांचे सीमाभागा विषयी काहीच देणे घेणे उरले नाही असे समजून आम्ही आमच्या मार्गाला लागू, असा निर्वाणीचा इशाराही शेळके यांनी दिला. या वेळी अनेक वक्त्यांनी या हल्ल्याचा निषेध नोंदवत उद्याच्या बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button