राज्य सरकारकडून अर्थसंकल्पात मातंग समाजावर अन्याय – अमित गोरखे
- हा परिपूर्ण अर्थसंकल्प नसून काही मंत्र्यांच्या फायद्याचा संकल्प
- भाजपा नेते गोरखे यांनी केला अर्थसंकल्पाचा जाहीर निषेध
पिंपरी / महाईन्यूज
महाराष्ट्र सरकारने आज राज्याचा अर्थसंकल्प जाहीर केला. त्यामध्ये समाजासाठी अत्यंत आवश्यक असणारे लोकशाहीर आण्णाभाऊ साठे विकास महामंडळासाठी कोणतीही घोषणा केली नाही. शिवाय आण्णाभाऊ साठे यांच्या जयंत्तीच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त काही तरतूद देखील केली नाही. त्यामुळे हा परिपूर्ण अर्थसंकल्प नसून सत्ताधा-यांनी स्वतःच्या फायद्यासाठी जाहीर केलेला हा संकल्प आहे. सरकारने जाणिवपूर्वक मातंग समाजावर अन्याय केला आहे, अशा शब्दांत अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष तथा भाजपाचे प्रदेश सचिव अमित गोरखे यांनी अर्थसंकल्पाचा जाहीर निषेध केला.
अमित गोरखे यांनी राज्यातील महाविकासआघाडी सरकारने आज जाहीर केलेल्या अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया देऊन आपली नाराजी व्यक्त केली. राज्याच्या अंदाजपत्रकात मातंग समाजासाठी कोणतीही तरतूद नाही. मातंग समाजामध्ये अस्वस्थता आहे. समाजाला उद्योग व्यवसाय करण्यासाठी अर्थपुरवठा करणारे महामंडळ दुर्लक्षित ठेवले आहे. तसेच, पुण्यातील संगमवाडी येथील क्रांतिगुरु लहुजी वस्ताद साळवे यांच्या राष्ट्रीय स्मारकासाठी ही अजिबात तरतूद नाही. मुंबई येथील लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांचे चिरानगर येथील राष्ट्रीय स्मारक उभारण्यासाठी तरतूद नाही. त्यामुळे राज्य सरकारने मातंग समाजावर अन्याय केला आहे. केवळ स्वतःचे हीत जोपासण्यासाठी काही घटकाला डोळ्यासमोर ठेवून अर्थसंकल्प सादर केला आहे.
सरकारने क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे आयोगाबाबत धोरण जाहीर करायला हवे होते. परंतु, त्यांनी केले नाही. यातून राज्य सरकारची जातीयवादी मानसिकता समोर आली आहे. मातंग समाजाला दुय्यम स्थान देणा-या महाभकास आघाडी सरकारचा संपूर्ण महाराष्ट्रभर आम्ही निषेध करणार आहोत, अशा शब्दांत अमित गोरखे यांनी नाराजी व्यक्त केली.