रेल्वे स्थानकांतील महिलांच्या विनयभंगाच्या घटनांची रेल्वेला डोकेदुखी
मुंबई : लोकलमधील महिलांच्या डब्यातून प्रवास करणाऱ्या महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर असून मध्य आणि पश्चिम रेल्वेतून प्रवास करताना महिला प्रवाशांच्या विनयभंगाच्या घटनांमध्ये वाढ होऊ लागली आहे. याबाबत लोहमार्ग पोलिसांकडे अनेक तक्रारी येऊ लागल्या आहेत. २०१७ पासून आतापर्यंत ५४७ महिला प्रवाशांनी विनयभंग झाल्याची तक्रार लोहमार्ग पोलिसांकडे केली आहे. या प्रकरणांमध्ये आरोपींनाही अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. मात्र अनेक महिला विनयभंग झाल्यानंतर तक्रार करण्याचे टाळत असल्याचे निदर्शनास आले आहे.
करोनाकाळापूर्वी दररोज मध्य आणि पश्चिम रेल्वे उपनगरीय मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या साधारण ७५ ते ८० लाख इतकी होती. यामध्ये महिला प्रवाशांची संख्या १५ ते २० टक्के होती. करोनामुळे टाळेबंदी लागू झाली आणि सर्व कारभार ठप्प झाला होता. मात्र अत्यवश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी लोकल सुरू करण्यात आली. त्यानंतर हळूहळू अटीसापेक्ष सर्वसामान्य नागरिकांसाठी लोकलचे दरवाजे उघडण्यात आले. करोना संसर्ग नियंत्रणात आल्यानंतर निर्बंध हटविण्यात आले. त्यामुळे आता लोकलच्या प्रवासी संख्येत मोठी वाढ झाली आहे. असे असले तरी करोनापूर्व काळाच्या तुलनेत प्रवासीसंख्या २० लाखांनी कमी आहे. सध्या लोकलमधून प्रवास करणाऱ्यांमध्ये महिला प्रवाशांचे प्रमाण अधिक आहे. लोकलमधून प्रवास करताना महिला प्रवाशांना विविध गुन्हेगारी स्वरुपाच्या समस्यांना तोंड द्यावे लागते. फलाट, पादचारीपूल व लोकलगाड्यांना असलेल्या गर्दीतून प्रवास करताना महिलांना विनयभंग, छेडछाडीच्या प्रकारांना सामोरे जावे लागते. महिलांविषयक गुन्ह्यांबाबत लोहमार्ग पोलिसांकडे सर्वाधिक नोंद होत आहे.