पिंपरी-चिंचवडमध्ये इंद्रायणी घाटावर छठ पूजेचा भक्तीसागर !
शहरातील १७ घाटांवर पूजा : गंगा आरतीचे आयोजन
पिंपरी : उद्योगनगरी पिंपरी चिंचवडमध्ये आज छठ महापूजा साजरी करण्यात आली. शहरातील एकूण 17 घाटांवर श्रद्धा, पूजा आणि भक्तीमय वातावरणात छठपूजा साजरी करण्यात आली. मोशी येथील इंद्रायणी नदी घाटावर छठ पूजा उत्सवानिमित्त महाकुंभ संपन्न झाला. काशी गंगा आरतीचे अद्भूत दृश्य पाहण्यासाठी भाविकांचा महासागर उसळला होता. यावेळी विश्व श्री राम सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.लालबाबू गुप्ता यांच्या विशेष निमंत्रणावरून 1008 महामंडलेश्वर स्वामी प्रणवानंद सरस्वती महाराज, सुदर्शन टीव्हीचे प्रमुख व राष्ट्र निर्माण संस्थेचे संस्थापक सुरेश चव्हाणके, श्यामजी महाराज, पुणे विद्यापीठाचे सदस्य राजेश पांडे उपस्थित होते.
या घाटावर एकूण 100 छठ मातेच्या बेद्या करण्यात आल्या होत्या. लाइफ गार्ड, रुग्णवाहिका, 3 बोटी, पोलीस सुरक्षा दल कानाकोपर्यात तैनात होते. ड्रोन कॅमेर्यांद्वारे नजर ठेवण्यात आली. आळंदीतून वारकरी सेवा फाऊंडेशनचे अध्यक्ष पांडुरंग शिवले, सचिव संयाराम हिवराळे, खजिनदार बालवधूत, योगी गणेश आदी उपस्थित होते. त्यांच्यासोबत मर्दानी काठ्या, तलवारबाजीची कलाबाजी होती.
सर्व मान्यवरांनी हिंदू धर्माला पुढे नेण्यासाठी, बळकट करण्यासाठी, हिंदु राष्ट्राच्या उभारणीसाठी संघटित होऊन ताकद दाखवण्याचे आवाहन केले. चव्हाणके म्हणाले की, बिहारची जनता देशात असो वा परदेशात आपली संस्कृती सोबत घेऊन जाते. पर्यावरण वाचवणे म्हणजे मानवता वाचवणे. राजेश पांडे यांनी डॉ. लालबाबू गुप्ता यांच्या कार्याचे कौतुक केले आणि महाराष्ट्रातील प्रशासनाकडून त्यांना सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. प्रणवानंद सरस्वती म्हणाले की, छठपूजेमध्ये शिस्त, संयम, समर्पण, पवित्रता पाळली जाते. डॉ.लालबाबू गुप्ता म्हणाले की, छठ पूजेच्या निमित्ताने देशातील नद्यांची स्वच्छता सप्ताह साजरा करण्याचे आवाहन पंतप्रधानांना केले.
दृश्य देवता भगवान सूर्य आणि छठी मैया यांच्या विशेष उपासनेशी संबंधित हा पवित्र सण बिहार, उत्तर प्रदेश, झारखंड आणि देशाच्या इतर भागांमध्ये मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. महिलांनी आज अष्टचलगामी सूर्याला अर्घ्य अर्पण करण्यापूर्वी गंगेत स्नान केले.सनातनी परंपरेत भगवान सूर्य आणि षष्ठी मातेचे व्रत मोठ्या नियमाने व संयमाने पाळले जाते. असे मानले जाते की जो व्यक्ती नियमानुसार हे व्रत करतो त्याच्या सर्व मनोकामना षष्ठी मायेने पूर्ण होतात. छठ व्रतामध्ये, विशेषत: सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करण्याचा नियम आहे, जो सूर्योदय आणि मावळतीच्या वेळी सौभाग्य आणि आरोग्याचे वरदान देतो. माता आपल्या पतीच्या कल्याणासाठी, घराच्या सुख-समृद्धीसाठी 36 तास निर्जल उपवास करतात. यामध्ये सूर्योदय आणि सूर्यास्त दोन्ही वेळी सूर्यदेवाची पूजा केली जाते.