‘समृद्धी महामार्गावरील प्रवाशांच्या मृत्यूला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री जबाबदार’; इम्तियाज जलील यांचा गंभीर आरोप
समृद्धी महामार्गावर अपघात नाही तर प्रवाशांची हत्या
अमरावती : समृद्धी महामार्गावर काल रात्री दीडच्या सुमारास प्रवासी बसचा भीषण अपघात झाला आहे. यामध्ये २५ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे तर ८ जण गंभीर जखमी आहेत. समृद्धी महामार्गावरून ही बस नागपूरहून पुण्याच्या दिशेने चालली होती. त्यावेळी बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजाजवळ पिंपळखुटा गावाजवळ हा अपघात झाला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अपघात स्थळाची थोड्या वेळात पाहाणी करणार आहेत. या पार्श्वभूमीवर MIM चे खासादार इम्तियाज जलील यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर गंभीर आरोप केले आहेत.
इम्तियाज जलील म्हणाले की, आपल्या राजनैतिक स्वार्थासाठी समृद्धी महामार्गाचे उद्घाटन करायचे होते. त्यावेळी कशा प्रकारे ड्रामा करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब एका गाडीमध्ये बसून एक मीडिया इवेंन्ट केलं होतं. त्यांना घाई होती उद्घाटन करण्यासाठी. त्याचा परिणाम काय होत आहे की दर दिवशी या समृद्धी महामार्गावर एक ना एक अपघात होत आहे.
हेही वाचा – ‘संभाजी भिंडेंचे ते विधान म्हणजे नालायकी’; आमदार बच्चू कडूंची सतप्त प्रतिक्रिया
आज झालेल्या अपघातात २५ लोकांचा मृत्यू झालेला आहे. मी याला अपघात म्हणणार नाही, ही हत्या आहे आणि यासाठी जबाबदार मुख्यमंत्री साहेब आणि उपमुख्यमंत्री साहेब आहेत. आता पुन्हा ते फक्त सहानभुती आणि मीडिया इव्हेन्ट साठी येणार आहेत. आणि तिथे जाणार आहेत. ५-५ लाख रूपये त्यांच्या सरकारमध्ये माणसाची किंमत झालेली आहे. ही घोषणा तिथे येऊन ते करणार आहेत, असंही इम्तियाज जलील म्हणाले.