Uncategorizedताज्या घडामोडीमुंबई
गाडीतून बाहेर पडायला एका सेकंदाचाही उशीर झाला असता तर…
मुंबई: ऑगस्ट महिना सुरु झाल्यापासून राज्यात पावसाने पुन्हा एकदा जोर पकडला आहे. राज्याच्या इतर भागांप्रमाणे मुंबईतही पावसाचा जोर प्रचंड वाढला आहे. विशेषत: पहाटेच्या वेळेत मुंबईत जोरदार पाऊस बरसताना दिसत आहे. मंगळवारी पहाटेही मुंबईत असाच धो-धो पाऊस सुरु असताना काळजाचा ठोका चुकवणारी दुर्घटना घडली. मुंबईच्या अंधेरी परिसरात मंगळवारी पहाटे कॉल सेंटरच्या कर्मचाऱ्यांना घरी घेऊन जात असलेली कार एका मोठ्या नाल्यात कोसळली. गेल्या काही दिवसांपासून मुंबईत सतत पाऊस पडत असल्याने या नाल्याला भरपूर पाणी होते. तसेच पहाटे पावसाचा जोर असल्याने नाल्यातील पाण्याचा प्रवाहदेखील जोरदार होता. त्यामुळे ही कार नाल्यात पडताक्षणी बुडायला लागली. मात्र, कारमधील कर्मचाऱ्यांनी वेळीच प्रसंगावधान राखत गाडीतून बाहेर पडण्यात यश मिळवले आणि त्यांचा जीव वाचला.