साताऱ्यात आर्टिगा कार पलटी होऊन भीषण अपघात
सातारा : जिल्ह्यातील सुर्ली येथे रविवारी रात्री १० वाजताच्या सुमारास आर्टिगा कार पलटी होऊन भीषण अपघात झाला. या अपघातात कोरेगाव तालुक्यातील आर्वी येथील ३ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. या अपघातानंतर आर्वी गावावर शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यात असणाऱ्या आर्वी येथील तुकाराम आबाजी माने (वय ६५ ), तानाजी आनंद माने (वय ६२) आणि सुभाष गणपत माने (वय ६० ) हे तिघेजण काही कामानिमित्त सातारा येथे गेले होते. काम आटोपल्यानंतर हे तिघेही साताऱ्याहून आर्वीकडे येत होते. यावेळी सुर्ली गावाजवळ असलेल्या वळणावर चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने आर्टिगा कार पलटली.
या अपघातामध्ये तिघेजण गंभीर जखमी झाले होते. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातातील जखमींना वाठार किरोली येथील युवकांनी सातारा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र तिथे डॉक्टरांनी तिघांनाही मृत घोषित केले.
दरम्यान, तीन जणांचा अपघाती मृत्यू झाल्याने माने कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.