पहिली ते चौथीपर्यंतच्या विद्यार्थ्यांचा गृहपाठ बंद केला जाणार – दीपक केसरकर
शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांची माहिती
राज्यात लवकरच नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर अभ्यासक्रम आणि त्याच्या रचनांमध्ये बदल केले जाणार आहेत. त्याचाच भाग म्हणून पहिली ते चौथीपर्यंतच्या विद्यार्थ्यांवर अभ्यासाचे ओझे न लादता, त्यांच्या मेंदूचा विकास होण्याकरिता त्यांचा गृहपाठ बंद केला जाणार आहे. त्यासाठी नवीन अभ्यासक्रम तयार करण्यासाठी समिती स्थापन केली जाणार असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिली.
पहिली ते चौथीपर्यंतच्या विद्यार्थ्यांचे गृहपाठ बंद करण्याची घोषणा शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी यापूर्वी केली होती. त्यानंतर शिक्षण विभागाकडे अनेक संस्थांनी अभ्यासक्रमासाठी शिफारशी केल्या. सोबत राज्यातील विविध शिक्षक संघटना, संस्थाचालक, शिक्षणतज्ज्ञ यांच्याशी मंत्री दीपक केसरकर यांनी चर्चा केली. शालेय शिक्षण विभागामार्फत बैठका घेऊन अंतिम निर्णय घेण्यात येणार असल्याचे मंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले होते.
गृहपाठ बंद झाल्यास शिक्षक, शाळा चुकीचा अर्थ काढतील, अथवा त्यातून पळवाटा काढतील, यासाठी खबरदारी घेतली जाणार आहे. नवीन आणि सध्याचा अभ्यासक्रम हा विद्यार्थ्यांना पटकन आणि योग्य समजेल, अशा पद्धतीने शिक्षकांनी शिकवण्याची आवश्यकता आहे. तशा पद्धतीने शिकविल्यास विद्यार्थ्यांना गृहपाठाची गरज नाही असं मंत्री केसरकर म्हणाले.